Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्या...म्हणून तुमचे उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावे; राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील...

…म्हणून तुमचे उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावे; राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील यांना पत्र

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray Wrote Letter To Manoj Jarange Patil) यांनी पत्र लिहिले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांची तब्यत खूपच खालावली आहे. त्यांना हातात माईकही धरता येत नाहीय. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी ट्वीट करत हे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, खोटारड्या आणि बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणे योग्य वाटत नाही. म्हणून तुमचे उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

काय म्हंटले राज ठाकरे

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,

सस्नेह जय महाराष्ट्र !

इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवे आहे. ते एकदा मिळाले की हे आपली सगळी आश्वासने विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणे योग्य वाटत नाही म्हणून तुमचे उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावे अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.

तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असे मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असेही म्हणालो होतो. नुसते जातीच्या नावाने मतं मागायची, खोटी आश्वासने द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो.

आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असे वाटले म्हणून ह्यांना मतदान केलेत. एकदा नाही अनेकदा केलेत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसे फार निष्ठुर आहेत. कोण गेले, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.

अ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा! ‘त्या’ एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ

ह्यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणे अत्यंत वाईट आहे. तसेच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्याने ते टोक गाठले की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला.

त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्राने या देशाचे प्रबोधन केले, विचार दिले, स्वाभिमानाने कसे जगायचे ते शिकवले तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश – बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही.

Uddhav Thackeray : …तर मी पंतप्रधान मोदींना भेटणार; मराठा आरक्षण, सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

जातीपातीतले द्वेषाचे राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढयांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणे महत्वाचे आहे, तसेच हे असले किळसवाणे राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणेही आपले आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही.

आपली अंतरवाली सराटीला भेट झाली तेंव्हाच मी आपल्याला बोललो होतो की ज्यांना विकासाची फळे आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. ह्या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावे अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणे अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक रहायला पाहिजे.

Maratha Protest : पुण्यात आंदोलक आक्रमक; नवले पुलावर जाळपोळ, वाहनांच्या रांगाच रांगा…

आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुले शिकणार. आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवले पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठे आहेत हे ही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहित नसते. आपल्याला ह्या बाबतीत बरेच काम करायचे आहे म्हणून आत्ता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका.

भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे.

जे ह्यांच्या कार्यकक्षेत येतच नाही अशा बाबतीत हे लोक आश्वासने कशी देतात? विरोधी पक्षात असताना तुमची मत मिळावीत म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या, आम्ही सत्तेवर येताच तात्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटे बोलणार आणि सत्तेत तुम्ही बसवले कि, कोण तुम्ही? कसले आरक्षण म्हणून पुन्हा हेच उध्दटासारखे तुम्हाला विचारणार. ह्या सर्वांची उत्तरे संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत.

Uddhav Thackeray : …तर मी पंतप्रधान मोदींना भेटणार; मराठा आरक्षण, सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे “विशेष अधिवेशन” भरवावे. सगळ्यांना कळू दे की कुणाचे काय म्हणणे आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा.

तोपर्यंत विनंती अशी की तुम्ही तुमचे उपोषण थांबवावे. समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू.. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणे बरोबर नाही.

त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत रहातात. हे बदलले पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. “सर्व मराठी एक” असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू..

पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे”..

शुभेच्छा आणि पुन्हा एकदा, जय महाराष्ट्र !

आपला

राज ठाकरे

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या