मुंबई । Mumbai
अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि ठाकरे गटाने आज मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि काही मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चासाठी परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी मागितलेला मार्ग कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा होता. “मी पोलिस आयुक्तांना विचारले की, परवानगी का नाकारली? साधारणपणे मोर्चासाठी परवानगी दिली जाते. पण आयुक्तांनी सांगितले की, मोर्चेकऱ्यांनी जाणीवपूर्वक असा मार्ग निवडला होता, जिथे तणाव निर्माण होण्याची शक्यता होती,” असे फडणवीस यांनी नमूद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्चेकऱ्यांनी सुचवलेला मार्ग त्यांना मान्य नव्हता. पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवला, पण तो मोर्चेकऱ्यांनी स्वीकारला नाही. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी शक्यता पोलिसांना वाटली. काही लोकांचा उद्देश शांततामय मोर्चा नसून गोंधळ घालण्याचा होता, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वसामान्यांना आश्वस्त करताना सांगितले की, कोणालाही शांततामय मोर्चा काढण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, जाणीवपूर्वक तणाव निर्माण करणाऱ्या मार्गाची निवड करणे चुकीचे आहे. “राज्यात सर्वांना एकत्र राहायचे आहे. पोलिसांनी सुचवलेल्या योग्य मार्गाने मोर्चा काढला, तर परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.
या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.





