मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे बंधू ही निवडणूक एकत्रित लढणार का याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाहीये. त्यांनी अद्याप युतीची घोषणा केली नाहीये. मात्र, दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये भेटीगाठी, जागावाटपांबाबत चर्चा होत आहे. गुरवारी म्हणजेच काल उध्दव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेत दिड तास चर्चा केली. या चर्चेत दोघांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, काल दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागांसाठी मनसेचा आग्रह आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या २० ते २५ जागांचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. तसेच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी ठाकरे बंधुंमध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंमध्ये याबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे.
यासोबतच, मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवलीतील जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याचे समजत आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर मोठी खलबते सुरु आहे. केवळ दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतरही ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोबत घेण्याकरता प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस स्वबळाचा नारा देऊनही मुंबईत शरद पवारांसोबत चूल मांडण्यासाठी उत्सुक आहे. या सगळ्यात मनसे सध्यातरी मविआपासून वेगळी असली तरी ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेला मविआत सामावून घेता येइल का? काँग्रेस वेगळी लढल्यास त्याचा ठाकरेंच्या युतीला फटका बसेल का? तसे झाल्यास काँग्रेसचे नेमके करायचे काय? या प्रश्नांवर दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये आज चर्चा झाल्याची माहिती आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




