मुंबई । Mumbai
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ चा थरार जिंकून मोठा पराक्रम गाजवला खरा, पण या ऐतिहासिक विजयानंतरही भारताला त्याच्या हक्काची ट्रॉफी अजूनही मिळालेली नाही! या संपूर्ण प्रकरणाला एक अनपेक्षित आणि वादग्रस्त वळण मिळाले असून, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी मंत्री मोहसीन नक्वी यांनी विजेतेपदाची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंचे मेडल्स चक्क हॉटेलवर चोरून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या गंभीर आणि अपमानास्पद घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तीव्र संताप व्यक्त केला असून, मोहसीन नक्वी यांना ७२ तासांत ट्रॉफी परत देण्याचे अल्टिमेटम दिले आहे. अन्यथा दुबई पोलीस ठाण्यात ट्रॉफी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी बीसीसीआयने दर्शवली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी तीव्र भावना अनेक भारतीयांची होती. तरीही भारतीय संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा सामना केला आणि अंतिम सामन्यात विजय मिळवला. मात्र, खेळाडूंनी मैदानावर काही गोष्टींचे पालन केले. पाकिस्तानसोबत अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक मेडल घेण्यास स्पष्टपणे नकार दिला.
या वादानंतर बराच वेळ भारतीय खेळाडू मैदानावर ट्रॉफीची वाट पाहत उभे होते. मात्र, भारतीय संघाला ट्रॉफी न देता मोहसीन नक्वी यांनी ती चोरून हॉटेलवर घेऊन गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली. आशिया कप जिंकून तास उलटले, तरीही ट्रॉफी न मिळाल्याने बीसीसीआयने तातडीने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
या गंभीर घटनेनंतर आशियाई क्रिकेट कौन्सिलची (ACC) दुबईत तातडीची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वी यांना ट्रॉफीच्या या वादग्रस्त प्रकरणावरून चांगलेच धारेवर धरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मोठा राडा झाला आणि इतर सर्व देशांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
बीसीसीआयच्या आक्रमक भूमिकेपुढे आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे अखेरीस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसीन नक्वी यांना माफी मागावी लागल्याचे अनेक रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. बैठकीमध्ये मोहसीन नक्वी यांनी आपली चूक मान्य करत म्हटले, “जे घडले ते चुकीचे आहे. आपण नव्याने सुरू करू. मी माफी मागतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने येऊन आशिया चषक घेऊन जावा.”
मोहसीन नक्वी यांनी माफी मागितली असली तरी बीसीसीआयची भूमिका अजूनही कठोर आहे. बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, पुढील ७२ तासांत मोहसीन नक्वी यांनी भारताची ट्रॉफी परत करावी, अन्यथा आम्ही दुबई पोलीस ठाण्यात ट्रॉफी चोरीचा गुन्हा दाखल करू. आता नक्वी यांच्या माफीनंतर बीसीसीआय यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण वादानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही मोहसीन नक्वी यांच्यावर टीका केली आहे. “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीपद ही दोन अतिशय महत्त्वाची पदे आहेत,” असे सांगत आफ्रिदीने नक्वी यांना राजकारण आणि क्रिकेट व्यवस्थापन यापैकी एक निवडण्याचा सल्ला दिला आहे. “पाकिस्तान क्रिकेटला विशेष लक्ष आणि वेळेची आवश्यकता आहे. मोहसीन नक्वी केवळ सल्लागारांवर अवलंबून राहू शकत नाहीत. त्यांनी आपल्या प्राधान्यक्रमाची निवड स्पष्ट करावी,” असे आफ्रिदीने म्हटले आहे.




