Sunday, September 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन : विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन : विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या , गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या वतीने सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण विरोधी पक्षाला देण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षाने आज पत्रकार परिषदेत सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisement -

विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कमिशनखोर, टेंडरबाज असल्याचा आरोप केला. या सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारमधील कमिशनखोरी ३० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. टेंडरबाज आणि कमिशनखोर म्हणून सरकारमधील प्रत्येकाची ओळख निर्माण झाली आहे. राज्य सरकारने समृद्धी महामार्ग, पुणे रिंगरोड, रस्ते विकासासाठी एक लाख कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या निविदा ३० ते ३५ टक्के जादा दराने काढून ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आणि यातून लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

स्मार्ट मीटरपासून ते आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यापर्यंतच्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरु असून गरिबांच्या खिशातून पैसे काढण्याचे पाप हे सरकार राजरोस करत आहे. आपल्या मर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे रुग्णवाहिका टेंडर देण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईत कार्यारंभ आदेश देण्यात आला. मुंबई महापालिकेच्या ठेवी १२ हजार कोटी रुपयांनी कमी झाल्या असून मुंबई महापालिका ओरबाडण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. एसटी महामंडळाच्या २ हजार २०० नवीन बस खरेदीची फाईल सहीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात पडून आहे. मात्र, कमिशन मिळत नसल्याने या फाईलवर मुख्यमंत्री कार्यलयाकडून सही होत नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी विश्वासघातकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या १० वर्षात सरकारने शेतकऱ्याला दीडपट हमीभाव दिला नाही. २०१३ साली सोयाबीनचे जे दर होते तेच दर आजही आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले. बियाणे, खते, शेती औजारे, ट्रॅक्टर आदींवर जीएसटी लावून या सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसण्याचे आणि त्यांना उद्धवस्त करण्याचे पाप सरकारने केले. केंद्र सरकारने गुजरातला कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्र विरोधी केंद्र सरकारच्या विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाज का उठवला नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

अंबादास दानवे यांनीही यावेळी सरकारवर हल्ला चढविला. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या