मुंबई | Mumbai
एसटी महामंडळाने (MSRTC) दिवाळी (Diwali) सणाच्या तोंडावर १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. वातानुकूलित आणि शिवाई बससेवा वगळता सर्व बस सेवांसाठी हा निर्णय लागू असेल, असे एसटी महामंडळाने सांगितले होते. मात्र, ही भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. शिंदे यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी महामंडळ दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द (Cancellation of Fare Hike) करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिल्याचे शिंदे यांनी म्हटले.
दरम्यान, दिवाळी सणासाठी लाखो लोक एसटी बसने प्रवास करतात. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. त्यामुळे नागरिकांकडून एसटी प्रवासाला (Travel) प्राधान्य दिल्याचे बघायला मिळते. यावर्षी देखील एसटी मंडळाने भाडेवाढ केली होती. पंरतु, राज्यातील बळीराजा आधीच अतिवृष्टीने खचून गेलेला असताना या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.




