मुंबई | Mumbai
स्टँडअप कॉमेडियन असलेल्या कुणाल कामरा यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका शोमध्ये गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ असे संबोधून त्यांची बदनामी केली , या आरोपाखाली अनेक एफआयआर दाखल झाल्याने अटकेची भीती असलेला कलाकार कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरा याने केलेली याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना कामराविरोधातील तपास सुरू ठेवावा, परंतु, याचिका प्रलंबित असेपर्यंत कामरा याच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ नये. तसेच, चेन्नई येथे जाऊन त्याचा जबाब नोंदवण्यात यावा, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले. तर पोलिस कनिष्ठ कोर्टात आरोपपत्रही दाखल करू शकतील. मात्र, त्या कोर्टाने उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्या आरोपपत्राची दखल घेऊ नये, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
कुणाल कामराने सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची मोडतोड केली होती. तसेच, आमदार मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलिसांनी कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याने आपला जबाब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नोंदवण्याची मागणी केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने १६ एप्रिल रोजी कामराला निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण १७ एप्रिलपर्यंत वाढवले होते. कामराने त्याच्या याचिकेत म्हटले होते की तो तमिळनाडूचा रहिवासी आहे आणि शोनंतर त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने तो महाराष्ट्रात येण्यास घाबरत आहे. त्यावरून न्यायालयाने मुंबई पोलिसांना चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.
मुंबईतील एका शोदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटल्याने कामराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी हा शो झाला होता, तिथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली होती. या शोदरम्यान कामराने ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील एका गाण्याची नक्कल करून त्यात शिंदेंना ‘गद्दार’ म्हटले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा