मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ (Mumbra Railway Station) लोकलमधून पडून प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजप सरकारने घेतलेले बळी आहेत. या दुर्घटनेची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला जबाबदार धरून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली.
गेल्या ११ वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची (Mumbai) जनता प्रवास सुखकर होणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या, हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहेत. पण या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपल्या जीवाने चुकती करावी लागते आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे सपकाळ म्हणाले.
एखादा अपघात झाली की तातडीने लोकलला (Local) स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली जाते, पण कृती शून्य असते. रेल्वे प्रशासन हे मुर्दाड आहे. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकलच्या समस्यांवर आवाज उठवला आहे. तरीही रेल्वे प्रशासन आणि सरकार यांची कुंभकर्णी झोप काही जात नाही. भाजप सरकारला (BJP Government) बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मुंबईकरांना बुलेट ट्रेन नव्हे तर लोकल सेवा व्यवस्थित पाहिजे, असेही सपकाळ यांनी सांगितले.