मुंबई | Mumbai
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congerss) स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी ही घोषणा केली असून, मुंबईत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथाला यांनी ही घोषणा केली.
यावेळी खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या की, मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढवणार असल्याचा निर्णय प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, हे आम्ही मांडले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आमची युती कायम राहिली आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत, असे त्यांनी म्हटले.
तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला बिहारच्या निवडणुकीवर (Bihar Election) भाष्य करतांना म्हणाले की, “हा निवडणूक आयोगाचा विजय असून, भाजपचा नाही. काँग्रेसमध्ये प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या पक्षात फक्त एका जातीचे लोक आहेत, ही आमची परंपरा आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला असून, याबाबत लोकांमध्ये जाऊन जागृती करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत असतात, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास होता विरोध
गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात आठ ते नऊ वेळा भेट झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू आगामी निवडणुका एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंचा पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्याने त्यांचा मनसेला मविआत घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र काँग्रेसने (Congress) त्याला विरोध दर्शविला. पंरतु, आता काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.





