Sunday, June 1, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : नागालँडच्या ७ आमदारांनी राष्ट्रवादीची साथ सोडली; अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar : नागालँडच्या ७ आमदारांनी राष्ट्रवादीची साथ सोडली; अजित पवार म्हणाले…

पुणे । Pune

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागालँडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या सात आमदारांनी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात (एनडीपीपी) प्रवेश केला आहे. या घडामोडींवर अजित पवार यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रविवारी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी या विषयावर भाष्य केलं.

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व सात आमदारांनी पक्ष सोडून एनडीपीपीमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून ते आजारी होते आणि रविवारीच प्रथमच ते सार्वजनिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले. सकाळीच त्यांना पक्षफुटीची आणि आमदारांनी साथ सोडल्याची माहिती मिळाली. “मी आजारी असल्याने या घडामोडींकडे पूर्ण लक्ष देऊ शकलो नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी सांगितले की, दोन ते तीन महिन्यांपूर्वी नागालँडच्या सात आमदारांनी मुंबईत येऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत आमदारांनी आपल्या नाराजीचा आणि कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. “त्यांच्या मनात खदखद होती. त्यांनी मला त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या,” असे पवार म्हणाले. या तक्रारींची दखल घेत त्यांनी नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. “मी त्यांना आमदारांच्या तक्रारींबाबत सांगितलं. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता,” असे पवार यांनी नमूद केले.

पक्षांतर बंदी कायद्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “सर्व सात आमदारांनी पक्ष सोडला आहे. अशा परिस्थितीत पक्षांतर बंदी कायदा कसा लागू होईल? दोन तृतियांश आमदारांचा मुद्दा असतो तेव्हाच हा कायदा लागू होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षांतर्गत या विषयावर चर्चा करून सामूहिक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नागालँडमधील राजकीय घडामोडींसोबतच अजित पवार यांनी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीवरही भाष्य केले. “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः कांदा उत्पादकांचे. पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्रस्ताव प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल,” असे त्यांनी सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, नागालँडमधील या पक्षफुटीमुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्ष आता या परिस्थितीचा सामना कसा करणार, याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी पक्षांतर्गत चर्चा करून सामूहिक निर्णय घेण्याचे संकेत दिले असले, तरी याचा पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू

0
सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) करंजाळी (Karnjali) येथील तेरा वर्षीय मुलीचा विहिरीत (Well) बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...