अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मान्सून पूर्व पावसाने मंगळवारी नगर तालुक्यात हाहाकार केला. नगर तालुक्याच्या दक्षिण भागात झालेल्या तुफान पावसाने पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला. वालुंबा नदीला आलेल्या पुरामुळे नगर-दौंड महामार्ग काही काळ बंद झाला होता. भोरवाडी व अकोळनेर येथील तलाव एकाच पावसात ओव्हरफ्लो झाल्याने पुराचे पाणी खडकी गावामध्ये शिरले. तर पुराच्या पाण्यात खडकी येथील काही नागरिक अडकले होते. सायंकाळी उशीरा नागरिक, नगर तालुका पोलीस व एनडीआरएफ जवानांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. यावेळी आ. काशिनाथ दाते हजर होते.
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला तलावांचे स्वरूप आले होते. तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. वाकळी येथे पावसाच्या पाण्यात थार गाडी वाहून गेल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा सलग तीन दिवस सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यानंतर मंगळवारी 3 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा जोरदार बॅटींग केली. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. तालुक्यात काही भागांत ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने भाजीपाला, कांदा, आंबा, केळी, पपई आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकर्यांची दाणादाण झाली.
मंगळवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला. चास, कामरगाव, सारोळा कासार, भोरवाडी परिसरात अक्षरशःढगफुटीसदृश पाऊस झाला. तुफान झालेल्या पावसाने अकोळनेर व भोरवाडी तलाव एकाच पावसात ओव्हरफ्लो झाला. पुराच्या पाण्याचे धोंडवाडी तलाव बुधवार सकाळपर्यंत ओव्हरफ्लो होवू शकतो अशी स्थिती आहे. गेल्या 50 वर्षात वालुंबा नदीला सर्वांत मोठा पूर आला. पुराच्या पाण्याने रौद्र रुप धारण केले होते. पुराच्या पाण्यात खडकी येथील सहा नागरिक अडकले होते. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. पुराच्या पाण्यात नागरिक अडकल्याचे माहिती मिळताच अनेकांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नारिकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले.
अतिवृष्टीचे पंचनामे करा – कर्डिले
नगर तालुक्यात खडकी, खंडाळा, अकोळनेर, चास, भोरवाडी, कामरगाव, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, बाबुर्डी घुमट, वाळकी या भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. अनेक बंधारे फुटून शेतकर्यांच्या शेतीत पाणी घुसल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबत स्थानिक शेतकर्यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी तातडीने पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधला व परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. गेल्या शंभर वर्षात मे महिन्यांत कधीच एवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. परंतु शेतकर्यांनी घाबरून न जाता झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यास सरकारी यंत्रणांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक मदत करेल, असे आश्वासन कर्डिले यांनी दिले आहे.
लंके, दाते यांनी दाखविली तत्परता
नगर तालुक्यात पावसाचा हाहाकार पहावयास मिळाला. चास, कामरगाव परिसरात पावसाने तुफान बॅटिंग केल्याने पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला. पुराचे पाणी अक्षरशः नागरिकांच्या घरात शिरले. खडकी येथील नागरिक पुराच्या वेढ्यात सापडल्याचे नागरिकांनी खासदार निलेश लंके व आमदार काशीनाथ दाते यांना माहिती दिली. खा. लंके व आ. दाते यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देत तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनीही खडकीच्या दिशेने धाव घेत प्रशासनाशी संपर्क केला. आपत्ती व्यवस्थापनाला माहिती देत आमदार दाते यांनी खडकीकडे धाव घेतली व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
प्रवासासाठी होड्या उपलब्ध करा – काळे
अजून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. या पावसानेच संपूर्ण शहराची दाणादाण उडाली असून शहराचा नरक झाला आहे. मान्सून पूर्वीच शहर पाण्याखाली गेले आहे. ही नैसर्गिक आपत्ती नव्हे, तर शहर ढिसाळ नियोजनाचे बळी ठरत आहे. नियोजन शून्य कारभार करणार्या मनपा प्रशासनाने अहिल्यानगरकरांना प्रवासासाठी होड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी खोचक जाहीर मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे.