अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत कारवाई करून जप्त केलेला 933 किलो 570 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गांजाची झाडे यांचा कायदेशीर मार्गाने नाश केला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समितीच्या देखरेखीखाली पार पडली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिम राबवली. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक (गृह) जगदीश भांबळ, एलसीबीचे निरीक्षक किरण कबाडी यांचा समावेश होता. या समितीने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला. संबधित तपासी अधिकार्यांमार्फत न्यायालयाकडून नाशासंबंधी परवानगी मिळवल्यानंतर ही प्रक्रिया राबवण्यात आली.
विशेष मोहिमेअंतर्गत जामखेड, तोफखाना, राहुरी, कर्जत, पारनेर, श्रीरामपूर शहर, शेवगाव, मिरजगाव, कोपरगाव, भिंगार कॅम्प, श्रीगोंदा व राहाता या पोलीस ठाण्यांमधील एकूण 20 गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील कंपनीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत गांजाचा नाश करण्यात आला. या कारवाईसाठी पोलीस अंमलदार शामसुंदर गुजर, पंकज व्यवहारे, संतोष खैरे, अतुल लोटके, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, जालिंदर माने, जयराम जंगले यांनी विशेष योगदान दिले.




