पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
तारवालानगर-अमृतधाम लिंकरोडवरील (Tarwalanagar-Amrutdham Link Road) खड्ड्यांनी आणखी एक जीव घेतला. शनिवारी (दि. १३) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सेवानिवृत्त शिक्षक दिनकर पांडुरंग झेटे (६१) यांचे रविवारी (दि.१४) उपचारादरम्यान निधन (Passed Away) झाले. प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
येवला येथील श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालयात सेवा करून नुकतेच निवृत्त झालेले शिक्षक झेटे कुटुंबासमवेत मखमलाबाद शिवारातील उदयनगर येथे राहत होते. शनिवारी रात्री ते अॅक्टिव्हावरून घराकडे जात अमृतधाम -असताना तारवालानगर लिंकरोडवरील मोठ्या खड्ड्यात (Potholes) दुचाकी आदळली. गाडीवरील नियंत्रण सुटून ते डोक्यावर खाली पडले. यात गंभीर दुखापत होऊन त्यांना जागेवरच मोठा रक्तस्राव झाला.
दरम्यान. अपघातानंतर (Accident) सामाजिक कार्यकर्ते राहुल जोरे, मेजर नीलेश पवार, मिलिंद परदेशी व चेतन दवंगे यांनी तत्काळ झेटे यांना खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, रविवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. या अपघातानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून ‘प्रशासनाने वेळेवर रस्त्यावरील खड्डे बुजवले असते तर निष्पाप जीव वाचला असता’ अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शी संतप्त
सामाजिक कार्यकर्ते राहुल जोरे अपघाताचे प्रत्यक्षदर्शी होते. जोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी झेटे यांना रुग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र, तरीदेखील त्यांची प्राणज्योत मालवली. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला, तक्रारी केल्या. मात्र, या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष के ले. हा अपघात नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा एक बळी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
हा तर प्रशासनाचा बळी
पावसाळ्यात खड्डे ही बाब पंचवटीकरांना नवीन नाही. तारवालानगर – अमृतधाम लिंकरोड अधिक वर्दळीचा रस्ता आहे. हा मार्ग रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा वाहनधारकांना प्रश्न पडतो. या मार्गावर झालेल्या अपघातात सेवानिवृत्त शिक्षक दिनकर झेटे यांचा मृत्यू हा प्रशासनाचा हलगर्जीपणामुळेच झाला आहे. याप्रकरणी मनपा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.




