नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील मालेगाव स्टॅन्डवरील ‘पंजाब रॅस्टॉरंट बार’च्या संचालकास ‘हप्ता वसुलीसह मोफत मद्यपानासाठी धमकावून मॅनेजरवर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात सुनील बागुल (Sunil Bagul) समर्थक मामा राजवाडेचा (Mama Rajwade) सहभाग समोर आला आहे. तसेच ‘चिरायू पतसंस्थेचा संचालक राहुल जैन बागमार व अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणात पंधरापैकी जैनसह अन्य चौघांना अटक (Arrested) करून युनिट एकमध्ये ‘दिवाळीचे फराळ चाखवून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा संशयितांनी हात जोडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिली.
‘गुन्हेगारीमुक्त नाशिक’ साठी शहर पोलिसांनी (City Police) सुरु केलेल्या या ‘साफसफाईत आता पुन्हा तथाकथित समाजसेवक व संघटनांचे पदाधिकारी रडारवर आल्याचे प्रकर्षाने दिसते. येत्या काळात पंचवटी व नाशिकरोड व उपनगर भागातून हा आकडा वाढता राहणार आहे. ‘पंजाब बार’च्या गुन्ह्यात प्रवीण सुकलाल कुमावत (रा. उदय कॉलनी, मखमलाबाद रोड, पंचवटी), बाबासाहेब शिवाजी बढे (रा. मारुती मंदिरामागे, तळेनगर, पंचवटी), राहुल मगनलाल जैन-बागमार (रा. हरिओम सोसायटी, इंदिरानगर, नाशिक), प्रकाश पांडुरंग गवळी (रा. पांडुरंग, मालेगाव स्टैंड), योगेश हिम्मतराव पवार (रा. साई अपार्टमेंट, शांतीनगर, मखमलाबाद रोड) या संशयितांना अटक झाली असून त्त्यांना न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, याच गुन्ह्यात, बोगेश पवार, मालेगाव स्टॅन्ड मित्र मंडळाचा अध्यक्ष व मामा राजवाडेचा पंटर विशाल देशमुख तसेच, संदीप पवार, लखन पवार, शरद पवार, धीरज शर्मा, चैतन्य दत्तात्रय कावरे आणि अन्य चार संशयितांचा शोध सुरु आहे.
राजवाडेच्या कार्यालयावरही ‘जेसीबी’
२६ फेब्रुवारी रोजी राजवाडे याने बार मॅनेजर राहुल नंदनला फोन करून ऑफिसवर बोलवून घेत बढ़े, पवार, गवळी, देशमुख आदींनी रिंगण करून ‘तू मामा राजवाडेच्या लोकांना आडवा येतो का रे, मध्ये मध्ये करतो, आम्हाला हप्ता देत नाही’, असे म्हणून रॉड व कोयत्याने ठार मारण्याचा प्रयत्न करुन डोक्यास गंभीर दुखापत केली. मामा राजवाडे व त्याच्या साथीदारांची परिसरात दहशत असल्याने भीतीपोटी तक्रार दिली नाही. पण, राजवाडे व साथीदारावर कारवाई झाल्याने धीर मिळाल्याने तकार दाखल झाली आहे. दरम्यान, सराईत मामा राजवाडे याच्या मालेगाव स्टॅन्डवरील संपर्क कार्यालयावर जेसीबीचा पंजा फिरविला जाण्याची शक्यता आहे.
कारवाईचा दणका असा
नांदूरनाका येथील जनार्दन नगरात ऑगस्ट महिन्यात घडलेल्या राहुल धोत्रेच्या खून प्रकरणानंतर शहर पोलीस ‘अॅक्टिव्ह’ झाले त्यात उद्धव निमसे यांना अटक झाली. यानंतर काही दिवसांतच निकम टोळीने राहुलवाडीत सागर जाधववर गोळीबार झाला. त्यात माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचे नाव आल्याने ते तुरुंगात गेले. यानंतर, सातपूरच्या ‘ऑरा’ बारमध्ये लोंढे गैंगने गोळीबार केला. त्यात प्रकाश लोंढे पिता-पुत्र गजाआड झाले. यानंतर त्यांच्या साम्राज्यावर बुलडोझर फिरविण्यात आला. हे होत असतानाच, विसेमळा येथे गोळीबार केल्याप्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचे तीन पुतणे व बागुल गैंगला अटक झाली. आता राजवाडेवर पुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने या गुन्हात पुन्हा त्याचा ताबा घेतला जाणार आहे. त्याचसोबत असे व अन्य स्वरुपाचे गुन्हे नोंद होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
फिर्यादीत काय?
१९ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत बारमध्ये संशयित राजवाडे व त्याचे साथीदार बढे, कुमावत, पवार गैंग, गवळी व इतर ५० हजारांचा ‘हप्ता’ मागण्यासाठी आले. देण्यास नकार दिला असता बारची तोडफोड करण्याची धमकी दिली त्याच रात्री बढे, कुमावत व पवार गैंगसह इतरांनी बारमध्ये ‘मोफत’ मद्य मागितले. नकार दिल्याने शटर बंद करण्याचा प्रयत्न करून हफ्ता न दिल्यास बार बंद करण्याची धमकी दिली. तसेच मागेल तेव्हा ‘हप्ता’ देण्याची मागणी केली. त्यानंतर धमकी देऊन दमदाटी केली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी धीरज शर्मा, राहुल बागमार, चैतन्य कावरे यांनी शिवीगाळ करून ‘जास्त माजलेत, तुम्ही मामा राजवाडेच्या माणसाला फुकट पार्सल आणि हप्ताचे पैसे देत नाहीत, तुमचे हात पाय तोडून माज जिरवतो, अशी धमकी दिली.
ठळक मुद्दे
- कोणत्याही संशयितांविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन
- नाव गोपनीय ठेवणार, प्रसंगी पोलीस सुरक्षाही पुरविणार
- शहरात अनेकांनी घेतला कारवाईचा धसका
- अनेक रिक्षांच्या काचेवर नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ घोषवाक्य
- रिल्सही व्हायरल, नाशिककरांचा गुन्हेगारी उद्घाटनास पाठिंबा




