नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या महात्मानगर भागात शांततेचा भंग करून विनापरवानगी वाद्यांचा गजर करणाऱ्या हॉटेल मिलेनियर्सला गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) चांगलाच दणका दिला आहे. वारंवार ताकीद देऊनही नियमांना ठेंगा दाखवणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनासह ऑर्केस्ट्रा कलाकारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
महात्मानगर येथील निशम अर्बनिया बिल्डिंगमध्ये हॉटेल मिलेनियर्स आहे. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या आवाजात ऑर्केस्ट्रा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या शालेय व महाविद्यालयीन परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत होता. रहिवाशांच्या (Citizen) तक्रारीची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा कोणतीही रीतसर परवानगी न घेता हा धिंगाणा सुरू असल्याचे समोर आले. यापूर्वीही संबंधित हॉटेलला नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आम्ही सुधारणार नाही असा, पण घेतलेल्या व्यवस्थापनावर अखेर कायदेशीर बडगा उगारण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी संशयित हितेश बलविरसिंग राजपूत, आबासाहेब पाराजी भडांगे, वैभव विनय पुराणिक या व्यवस्थापकांसह गायक जीत संजय बोरा आणि गिटारवादक भावेश दिलीप राणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २७०, २९२, २९३, २२३, ३(५) सह तसेच मुंबई पोलीस अॅक्ट ३८, १३६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे अधिक तपास करत आहेत.
मोठ्या हॉटेल्सचे आवाज बंद होणार?
गंगापूर रोड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असतानाच, नागरिकांनी एक संतप्त सवालही उपस्थित केला आहे. शहरातील अनेक बड्या हॉटेल्समध्ये दर विकेंडला कानठळ्या बसवणारे संगीत आणि ऑर्केस्ट्रा रंगतात. हे बडे मासे पोलिसांच्या रडारवर कधी येणार? केवळ तक्रार झाल्यावरच कारवाई होणार की पोलीस स्वतःहून या ध्वनी प्रदूषणाचा बंदोबस्त करणार, याकडे आता नाशिककरांचे लक्ष आहे. बेशिस्त हॉटेलचालकांना हा इशारा असून, यापुढे अशाच कारवाईचा सत्र सुरू राहिल्यास रात्रीच्या शांततेचा भंग करणाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत.





