नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत दोनच दिवसापूर्वी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी तसेच भाजपाच्या तीन आमदारांनी (MLA) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली होती. या घटनेला ४८ तास पूर्ण होत नाही तोवरच विजयादशमीच्या पहाटे दुचाकी गाडीवर आलेल्या टोळक्याने पाच ते सहा गाड्यांची येथील धोंगडेनगर आणि डावखर वाडी परिसरात तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे नाशिक रोडच्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
नवरात्र (Navratra) उत्सवचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वत्र ठिकाणी विविध मंडळांनी दांडिया रासचे कार्यक्रम आयोजित केले होते. दांडिया (Dandiya) रासची धामधूम रात्री बारा वाजेला संपल्यानंतर सर्वजण घरी गाड झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास दुचाकी गाडीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने डावखरवाडी, धोंगडे नगर परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या प्रकाराने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात असून नाशिकची गुन्हेगारी थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तसेच गाड्यांची तोडफोड झाल्याचे समजताच शिवसेना ठाकरे गटाचे अतुल धोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तेथील रहिवाशांना दिलासा दिला. तसेच या घटनेप्रकरणी पोलिसांना (Police) माहिती मिळाली असून ते सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घेत आहे.
दोनच दिवसापूर्वी कारागृहातून सुटलेल्या ‘चिमण्या’ भाईची मिरवणूक काढणाऱ्या समर्थकांची नाशिकरोड पोलिसांनी धिंड काढली होती. यामुळे गुंडांना वचक बसेल असे वाटत होते. मात्र गुंडांनी (Criminal) गाड्यांची तोडफोड करून एक प्रकारे पोलिसांना आवाहन दिल्याची चर्चा नाशिकरोड (Nashik Road) मध्ये आहे.





