नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सन २०१६ मध्ये भारतीय सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात (Pakistan) गेल्यावर भारतात (India) परतल्यानंतर सैन्यातून बडतर्फ झालेला लष्करी जवान चंदू बाबूलाल चव्हाण याच्यावर आता थेट मिलिटरीने गुन्हा दाखल केला आहे. सैन्याविरोधात यूट्यूब व इतर माध्यमांतून बिनबुडाची टीका केल्याचे भारतीय सैन्याच्या नजरेस पडल्याने त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deovlali Camp Police Station) चंदूविरोधात विविध गंभीर कलमान्वये फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे त्याने सातत्याने सैन्यदलासह सरकारविरुद्ध आंदोलन, आत्मदहन, भीक मांगो आंदोलन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आर्टिलरी सेंटरमधील सचिन गंगाधर गुजाळ (३८, रा. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २६ एप्रिल २०२४ ते ३० मे २०२५ या कालावधीत चंदूच्या कृत्यांमुळे भारतीय न्यायसंहितेच्या १५९. ३५३ (१) (अ), १६१, १६३ व १६८ अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ मे रोजी गुंजाळ हे आर्टिलरी स्टेंटीक वर्कशॉपवरील ड्युटीवर हजर असताना वरिष्ठांनी त्यांना बोलावले. चंदू चव्हाणने यूट्यूब चॅनलवर भारतीय सैन्याविषयी चुकीची माहिती दिल्याचे सांगत वरिष्ठांनी त्यांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. तेव्हा सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुंजाळ यांना दिलेल्या सीडीतील काही व्हिडिओ त्यांनी बघितले. त्यामध्ये खोट्या माहितीवर आधारित व्हिडिओ (Video) चव्हाणने बनवले असून, सैन्यदलात बंड घडवण्याचा त्याचा उद्देश दिसतो.
जवानांना (Solider) विचलित करून वरिष्ठांवर हल्ला करण्यासह नोकरी सोडण्यासाठी चिथावणी देण्याचा उद्देश दिसतो. बडतर्फ असतानाही शासकीय गणवेशाचा वापर चव्हाणने केला. यासह चव्हाण याने विविध वेळी यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओत गुन्हेगारी स्वरुपाचे वक्तव्य केले असून, विविध सैन्यातून बडतर्फ केलेल्या जवानाचे पत्रकार मुलाखत घेत असल्याचे जुने व्हिडिओ अपलोड केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देशासाठी शहीद झालेल्यांना कोणीही विचारत नाही. देशात पंधरा लाख बडतर्फ जवान असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे चव्हाण खोटे सांगतो.
मुंबई, दिल्ली, लखनीत सैन्याचा गणवेश परिधान करून गळ्यात ‘मर्द नेताओं की तलाश’चा फलक घालून भीक मागून अर्धवट व चुकीची माहिती पसरवतो. सोशल मीडियावरून (Social Media) जनतेला सैन्यदलात मुलांना भरती करू नका, असे सांगत राज्य व केंद्र शासनाविरुद्ध (Central Government) बिनबुडाचे आरोप करतो. बडतर्फ केल्यानंतर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असताना सैन्याला कर्तव्यांपासून विचलित करण्याचा प्रयत्न चव्हाण करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तीन रेड एन्ट्रीनंतर बडतर्फी
लष्करी, निमलष्करी व पोलिसात भरती होताना कर्तव्याचे नियमन करणाऱ्या सर्व कायद्यांची व नियमांची माहिती दिली जाते. या दलांमध्ये तीन ‘रेड एन्ट्री’ नंतर चौथ्यांदा बडतर्फ केले जाते. याबाबत जवानांना पूर्ण माहिती असते. तरीही चंदू चव्हाण हा केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खासगी काम केले नाही, यामुळे बडतर्फ केल्याची खोटी माहिती जनतेत पोहोचवत आहे’, असे फिर्यादीत नमूद आहे. यासह १ नोव्हेंबर २०२४, २८ सप्टेंबर २०२४, १३ ऑक्टोबर २०२४, ३ मार्च २०२५, १२ फेब्रुवारी २०२५, २८ जानेवारी २०२५, २९ डिसेंबर २०२४ या दिनांकांच्या ९ व्हिडिओसंदर्भात विस्तृत मुद्दे फिर्यादीत आहेत.
चंदू लढाईसाठी गेला नाही !
‘चंदू चव्हाणचे सर्वच व्हिडिओ बघितल्यानंतर, तो अनावधानाने पाकिस्तान हद्दीत हत्यारासह केला होता. तो पाकिस्तानशी लढाईसाठी गेला नव्हता. त्याच्या अपराधाबाबत शिक्षा देण्यात आल्या आहेत. त्याने वारंवार गंभीर कसुरी व कृत्य केले असून, आर्मी अॅक्ट १९५० च्या तरतुदीचे पालन करून त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. त्याला बाजू मांडण्याची पूर्ण मुभा दिली आहे. या अॅक्टनुसार, सैनिकाला त्याच्या कर्तव्याचा भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सहाय्यक म्हणून कार्यालयीन वैयक्तिक कामे करावी लागतात. युद्धजन्य परिस्थिती नसताना गवत कापणे, झाड लावणे, परिसरात रंगरंगोटी करणे, वाहनांची दुरुस्ती ही कामे करावी लागतात. हे फक्त सैन्यात नव्हे, तर निमलष्करी दलात व पोलीस दलात लागू असून, कर्तव्याचा भाग आहे.
असा आहे चंदू चव्हाण
चंदू चव्हाण हा मूळचा धुळे जिल्ह्यातील मोहाडीतील आहे. २९ सप्टेंबर २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. त्यावेळी राष्ट्रीय रायफल ३७ मध्ये कार्यरत चव्हाण याने पाकिस्तान सीमेवर तैनात असताना ‘सीमारेषा’ ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यामुळे ३ महिने २१ दिवस तो पाकिस्तानच्या ताब्यात होता. भारत सरकारच्या प्रयत्नांनंतर त्याला मायदेशी पाठवण्यात आले. धुळ्यात परतल्यावर त्याचे जंगी स्वागत झाले होते. काही दिवसांच्या सुटीनंतर चव्हाणचे ‘कोर्ट मार्शल’ झाले. आठ महिन्यांच्या चौकशीनंतर त्याला दोन महिने कारागृहात ठेवले गेले. कारण २९ सप्टेंबर रोजी वरिष्ठांच्या विनापरवानगी त्याने चौकी सोडत सीमारेषा ओलांडली होती. छळ होत असल्याचे सांगत सन २०१९ मध्ये त्याने राजीनामा दिला होता. सैन्याने त्याचे दावे फेटाळून लावले होते. त्याच्याविरुद्ध पाचवेळा शिस्तभंगाची कारवाई झाली. त्यानंतर बडतर्फ केले गेले.