नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जैवइंधन व तत्सम उत्पादनांत कार्यरत तेलंगणा (Telangana) येथील ‘ईव्हा ग्रीन प्लॅनेट प्रा. लि.’ या कंपनीच्या (Company) दोन संचालकांनी संगनमताने बनावट दस्तावेज तयार करत अन्य संचालकांची फसवणूक (Fraud) केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कंपनीचे संचालक संशयित अँडी नवाज खान आणि मथिवाथनी सेल्वासुंदरम यांच्यावर १६ कोटी आणि १२ कोटी अशा एकूण २८ कोटी रुपयांच्या खंडणी मागणीचा आरोप करण्यात आला आहे.
त्यान्वये अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मथिवाथनी सेल्वासुंदरम् आणि अँडी नवाज खान (दोघे रा. कोलंबो, श्रीलंका) अशी संशयित संचालकांची नावे आहेत. कामटवाडा येथील अभियंता नगरात राहणारे ३८ वर्षीय चिराग विलास पाटील यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार, ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक असून वरील कंपनीत कार्यरत आहेत.
फिर्यादीनुसार व पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, ईव्हा कंपनीने ‘इं.रि.ए.डे.ए.’ या संस्थेकडून रु. १४.२३ कोटींचे कर्ज घेतले होते. कर्जासाठी संचालकांनी वैयक्तिक हमी दिली होती. यामध्ये मथिवाथनी आणि अँडी नवाज खान यांच्यावर रु. ६.०९ कोटींचे दायित्व होते. परंतु या दोघांनी केवळ २.१५ कोटी रुपये भरून उर्वरित रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. कंपनीच्या सीईओ ऐश्वर्या देव पेंड्याला यांना कंपनीच्या ईमेलमध्ये एक संशयास्पद पत्र आढळून आले. तपासणीअंती समजले की, मथिवाथनी आणि अँडी खान यांनी कंपनीच्या इतर संचालकांच्या सहीचा बनावट वापर करून आरबीआयला खोटे पत्र पाठवले.
दरम्यान, हे प्रकरण फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे तपासणीस दिल्यावर दस्त बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यावरून विरोध केल्यानंतर अँडी खान आणि मथिवाथनी यांनी कंपनी सुरू होऊ न देण्याची धमकी देत १० एप्रिल २०२५ रोजी १६ कोटी रुपयांची आणि २९ मे रोजी १२ कोटी रुपयांची (Money) खंडणी कंपनीकडे मागितली.
संशयितांचा कारनामा
एवढेच नव्हे, तर ‘इं.रि.ए.डे.ए.’ संस्थेकडून दिलेली वैयक्तिक हमी रोखली जाईल, अशी धमकीही ईमेलने पाठविली. या सर्व प्रकारामुळे कंपनीच्या इतर संचालकांमध्ये प्रचंड संताप असून, त्यांनी या दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. विश्वासघात, बनावट कागदपत्रांची निर्मिती, खंडणी मागणी आणि कंपनीच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तपास अंबड पोलीस करीत आहे.





