मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ( Malegaon Municipal Corporation Election) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शुक्रवारी अंतिम मुदतीपर्यंत ५२६ पैकी २२५ इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज माघार घेत निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अपक्ष व बंडखोरांच्या मांदियाळीने बहुतांश प्रभागांत तिरंगी, चौरंगीसह बहुरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र काल माघारीनंतर स्पष्ट झाले.
महानगरपालिके च्या निवडणुकीसाठी (Election) २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी ८८० इच्छुकांनी १,६४२ नामांकन अर्ज ३० डिसेंबरपर्यंत खरेदी केले होते. मात्र अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ८०८ नामांकन अर्ज इच्छुकांतर्फे दाखल करण्यात आले होते. छाननी प्रक्रियेत ९४ नामांकन अर्ज विविध कारणास्तव अवैध ठरले तर ५२६ नामांकन अर्ज अधिकाऱ्यांतर्फे वैध ठरवण्यात आले होते.
हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : १२२ जागांसाठी १३९० रिंगणात; एकूण ६८९ उमेदवारांची माघार
माघारीच्या शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदतीत ५२६ पैकी २२५ इच्छुकांनी माघार घेतल्याने ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. सर्वच प्रभागांत अपक्ष उमेदवारांसह काही प्रभागात पक्षीय बंडखोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याने यामुळे होणारी मतविभागणी पक्षातर्फे निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची चिंता तर नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक एक, नऊ व १० मधील १२ जागांसाठी ४६ तसेच प्रभाग क्रमांक दोन, ११ व १२ मधील १२ जागांसाठी ४६, प्रभाग तीन, सहा व सातमधील १२ जागांकरता ४० याबरोबर प्रभाग क्रमांक चार, पाच व आठ मधील १२ जागांकरता ४४, प्रभाग क्रमांक १३, १५ व १७ च्या १२ जागांसाठी ३८ तसेच प्रभाग १४ व १९ मधील १२ जागांसाठी ३६ व प्रभाग क्रमांक १८, २०, २१ मधील १२ जागांसाठी ४७ उमेदवार असे ३०१ उमेदवार (Candidate) निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
माघारीसाठी नेते, पदाधिकाऱ्यांची दमछाक
महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप, एमआयएम इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टी आदी पक्षांतर्फे उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छुकांनी पक्षासह अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केले होते. उमेदवारी नाकारण्यात आल्याने या इच्छुक उमेदवारांनी बंड करू नये यासाठी सर्वच पक्षनेत्यांसह पदाधिकाऱ्यांतर्फे दोन दिवसांपासून मनधरणी व समजूत काढण्यासाठी रात्रीचा दिवस केला गेला. आज दुपारी दोन वाजेपर्यंत नेत्यांतर्फे माघारीसाठी मनधरणीचा प्रयोग इच्छुकांच्या घरी व ऑफिसात सुरू होता. त्यामुळे त्यास काही प्रमाणात यशदेखील आल्याचे मोठ्या प्रमाणात आज इच्छुकांनी घेतलेल्या माघारीवरून दिसून आले.




