नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महानगरपालिक निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘लक्ष्मीदर्शनाच्या’ चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपांनी निवडणूक प्रक्रिया वादात सापडली होती. एका मतासाठी हजारों रुपयांची रक्कम दिल्याच्या चर्चांमुळे लोकशाहीच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीतही अशाच प्रकारची पुनरावृत्ती होणार की काय?, अशी भीती सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!
आज प्रचाराची सांगता होत असतानाच प्रत्यक्षात मतदारांपर्यंत (Voters) पोहोचून आर्थिक गणिते जुळवण्याचे काम वेगाने सुरू असल्याची चर्चा आहे. गुप्त यंत्रणांच्या माध्यमातून घरोघरी पाकिटांचे वाटप सुरू असल्याचे बोलले जात असून, काही ठिकाणी खुले आर्थिक व्यवहार होत असल्याचेही सांगितले जात आहे. दोन हजार ते पाच हजारांपर्यंत एका मताला भाव फुटल्याचे बोलले जात असून, संपूर्ण पॅनलचे वीस हजार रुपये वाटले जात असल्याची चर्चा सुरु आहे. या पैसे वाटपाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची
दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे प्रशासन पुरेसे गांभीर्याने पाहत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे आता जाहीर प्रचार थांबल्यानंतर आगामी दोन दिवसांत पैशांचा (Money) महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, निवडणुका म्हणजे आर्थिक ताकदीवर सत्ता मिळवण्याचे साधन बनत चालल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत मतदार राजा विकाऊ झाला आहे काय?, असा सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत. आर्थिक व्यवहारातून सत्ता स्थापन होणे लोकशाहीला अपेक्षित नसल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि अशा प्रवृत्तींविरोधातही पोलिसांनी (Police) ‘कायद्याचा बालेकिल्ला’ स्थापित करावा, अशी जोरदार मागणी जाणकार नागरीकांद्वारे केली जात आहे.




