नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचा पाणीपट्टी थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपाकडून लवकरच विषेश थकबाकी वसुली मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये पाणीपट्टी थकबाकीदारांना थेट वारंट बजावण्यात येणार आहे. पाणीपट्टी थकबाकीचा आकडा आता १६४ कोटींवर पोहचला आहे.
आता पर्यंत मात्र २५ कोर्टीची पाणीपट्टी वसूल झाली आहे. मनपाच्या आर्थिक उत्पन्नात करसंकलन विभाग महत्वाचा असून घरपट्टी व पाणीपट्टीमुळे अडिचशे कोटींचे उत्पन्न तिजोरीत जमा होते. एप्रिल ते जून सवलत योजना व त्यानंतर दोन महिन्यांपासून सुरु असलेली अभय योजनेमुळे थकीत घरपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुली ३८ कोटी सरप्लस आहे. अभय योजनेमुळे बिलावरील शास्तीचा फुगवटाही कमी झाला आहे. मात्र घरपट्टी वसुलीत मुसंडी मारलेली असताना करसंकलन विभागासाठी पाणीपट्टी वसुली डोकेदुखी ठरत आहे. नागरीक पाणीपट्टी भरत नसल्याने थकबाकीचा आकडा १६४ कोटींच्या घरात पोहचला आहे.
शहरात सव्वादोन लाख नळकनेक्शनधारक आहे. मनपाकडून अगदी पाच रुपयात हजार लिटर पिण्यायोग्य पाणी पुरवले जाते. तरी नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित अदा करण्यात येत नाही. मनपाकडून पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार दरवर्षी पार पाडले जातात. पण नागरिक त्यास जुमानेसे झाले आहेत. मनपाकडून नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई हाती घेतली जाते. मात्र राजकीय दबावापुढे मनपा प्रशासन नांगी टाकते. परिणामी थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून पाणी पुरवठ्याचा खर्चही निघेनासा झाला आहे. सर्वाधिक थकबाकी पंचवटी व त्या खालोखाल नाशिकरोड विभागाची आहे. दरम्यान, मार्चएंड जवळ आला असून आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विभागनिहाय थकबाकी
सातपूर – २१ कोटी, ८६ लाख
पंचवटी – ३५ कोटी, ६६ लाख
नवीन नाशिक – ३० कोटी, ४७ लाख
नाशिकरोड – ३३ कोटी, १८ लाख
नाशिक पश्चिम – १३ कोटी, ९८ लाख
नाशिक पूर्व – २९ कोटी, ८२ लाख