नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात बुधवार (दि.५) ची सकाळ दाट (Fog) धुक्याने उजाडली.जिल्ह्यातील अनेक भागात या धुक्याची दाट झालर असल्याने सूर्योदय होऊन तास दोन तासाचा अवधी उलटल्यानंतर देखील वाहनचालकांना वाहनाचे दिवे लावूनच आपली वाहने चालव्हावी लागत होती. सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वत्र हीच स्थिती होती. धुक्यातून वाट काढत जिल्हावासीय सकाळचा फेरफटका मारताना दिसले.अचानक आलेल्या या धुक्याचा फटका रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) चिंतेचे वातावरण आहे.
या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील विविध भागात सकाळी ९ वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली होती. हे वातावरण असेच कायम राहिल्यास मानवी जीवनाबरोबरच, पशुधन यांचे आरोग्य बिघडणार आहे. याहीपेक्षा रब्बी हंगामातील कांदा, द्राक्ष, फळे, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांना (Crop) मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक औषधे फवारण्याचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्यामुळे आर्थिक गणिते बिघडणार आहे. यामुळे शेतकरी या वातावरणामुळे चिंताग्रस्त आहेत.
सध्या धुके पडत असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीक पाणी भरणी जोरात असून पाट पाण्यांचे आवर्तने सुरु आहेत. यामुळे वरील सर्व गोष्टी जुळून येत आहेत.
माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ञ
धुके का पडले?
धुके पडणाऱ्या ठिकाणी, त्यावेळी, इतर भागापेक्षा तुलनात्मक असलेल्या अधिक आवश्यक खालील गोष्टी कारणीभूत असतात.
१) पहाटेच्या किमान तापमानात घट
२) निरभ्र आकाश
३) पाणस्थळ भाग
४) समुद्र सपाटीपासुन कमी उंची
५) त्यावेळी हवेचा उच्च दाब
६) वाढलेली सापेक्ष आर्द्रता
७) शांत वारा
८) जमिनीत अतिरिक्त वाढलेले ओलाव्याचे प्रमाण





