नाशिक | Nashik
राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी १० ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी सहा या कालावधीत सूचना, अभिप्राय द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत परीक्षा (Exam) पद्धतीतील सुधारणा, पारदर्शकता, प्रश्नपत्रिका सुरक्षितता, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा केंद्रांचे मानकीकरण, उत्कृष्ट कार्यपद्धतींचा अवलंब, विविध विभागांमधील समन्वय आणि तक्रार निवारण यांसारख्या विषयांवर सूचना व अभिप्राय सादर करता येणार आहेत. सूचना व अभिप्राय सादर करण्यासाठी दिनांक १० ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखा, पहिला मजला येथील नोडल कक्षाशी संपर्क साधावा. या उपक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लेखी अथवा ऑनलाइन अभिप्राय सादर करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे nashik.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. या उपक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवून राज्यातील भरती परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित व प्रभावी करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.




