नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निफाड तालुक्यातील केजीएस शुगर ॲण्ड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (KGS Sugar and Infra Corporation Limited) नाशिक, मुंबई व शिर्डी येथील स्थावर व जंगम मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे (Raid) टाकले. या छाप्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी ७०.३९ लाखांची रक्कम, १.३६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, आलिशान बीएमडब्ल्यू कार व १० लाख रुपयांचे डीमॅट खाते/शेअर्स, हार्डडिस्क, बेनामी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि रेकॉर्ड जप्त केले आहे. काही राष्ट्रीयकृत बँकांना साडेतीनशे कोटी रुपयांचा चुना लावल्याबाबत जालना येथे दाखल गुन्ह्याच्या एफआयआर व आरोपपत्राच्या अनुषंगाने ही कारवाई सुरु आहे.
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) पिंपळगाव निपाणी येथे केजीएस शुगर कारखाना असून कारखान्याच्या काही संचालकांसह संशयित दिनकर बोडके व इतरांनी मेसर्स केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आधारे बनावट कर्जप्रकरणे, फसवणूक, गुन्हेगारी कट रचून बनावट कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावे खरे म्हणून वापरणे अशा अनेक कलमान्वये जालना जिल्ह्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच आरोपपत्राच्या आधारे ईडीने (ED) तपास सुरू केला असून त्यात, मेसर्स केजीएस शुगरने कॅनरा बँकेच्या एका वित्तीय गटाकडून सुमारे ३५० कोटी रुपयांचे बँक कर्ज फसवणूक (Fraud) करून मिळवले.
संशयित बोडके व इतरांनी काही संचालित व त्रेहस्थ संस्थांचा वापर करून राउंड-ट्रिपिंग आणि इतर पद्धतीने कोट्यवधी रुपये मिळवून ते इतरत्र हस्तांतरीत केले. विशेष म्हणजे कर्जाची रक्कम त्याच कामासाठी न वापरता ती वास्तविक व्यावसायिक व्यवहारांच्या नावाखाली दाखवली. हेव पैसे (Money) काही कंत्राटदार, ईपीसी कंत्राटदार आणि इतरांशी जोडलेल्या संस्थांद्वारे चळवण्यात आले. तपासात अशा बाबी समोर आल्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालयाने (दि. २३) नाशिक, कोपरगाव (शिर्डी) आणि ठाणे येथील अनेक निवासी आणि व्यावसायिक जागांवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदीनुसार छापे टाकले. दरम्यान, काही पसार संशयितांचा शोध पोलिसांसह यंत्रणांकडून सुरु आहे.
सहकार क्षेत्रात खळबळ
मेसर्स केजीएस शुगर आणि इतरांविरुद्ध बँक फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याबद्दल सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात हे छापे टाकण्यात आले. बनावट आणि खोटे कागदपत्रे सादर करून ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक कर्ज फसवणूक करून मिळवण्यात आले आणि त्यानंतर वैयक्तिक फायद्यासाठी आणि मालमत्ता संपादित करण्यासाठी या कर्जाची रक्कम वापरल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. त्यानुसार, गुन्ह्याशी निगडीत महागडी वाहने, सोने, मालमत्तांवर टाच आणली जात आहे. यामुळे निफाडसह नाशिकच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नागरिकांच्या आशा पल्लवित
निफाड तालुक्यातून एका दिवंगत सहकार नेत्याने रासाका व निसाका बंद पडल्याने ऊस उत्पादकांच्या भल्यासाठी मेसर्स के.जी.एस. शुगर ॲण्ड इन्फ्रा कंपनी या साखर कारखान्याची निर्मिती केली होती. यासाठी त्यांनी आपले कुटुंब पणाला लावले होते. परंतु नात्यातीलच बोडके नावाच्या कार्यकारी संचालकाने त्यांच्या विश्वासाला सुरुंग लावला. साखर कारखान्यात अनैतिक मार्गाने भ्रष्टाचार करून या दिवंगत नेत्याच्या कुटुंबासह राष्ट्रीयकृत बँकांना, सभासद, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी, ट्रकचालक-मालक, ऊसतोड मुकादम, मजूर यांना चुना लावत कोट्यवधींची अफरातफर केली होती. हा खासगी साखर कारखाना सहा वर्षांपासून बंद ठेवला होता. यामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादकांचे करोडो रुपयांचे उसाचे पैसे येणे आहे. यावर कळस म्हणजे बँक प्रशासनाला हाताशी धरून बोडके यांनी ऊस ट्रकचालक-मालक यांच्या नावावर करारासाठी दिलेल्या धनादेशावर लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. कर्ज बोडकेंनी काढले परंतु हे कर्ज भरण्यासाठी तालुक्यातील ट्रकमालकांना संबंधित बँकांच्या नोटिसा येऊन या कर्जप्रकरणात २५० ट्रकमालकांना गोवण्यात आले आहे. तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने हा खासगी साखर कारखाना सुरू झाल्याने ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु या अफरातफरीमुळे तालुक्यातील ऊस उत्पादक ‘आगीतून उठून फुफाट्यात’ पडल्यासारखे या गैरकारभारामुळे अनुभवायला मिळाले आहे. ईडी आता काय कारवाई करते व संशयित आरोपींकडून संबंधित रक्कम वसूल करून ऊस उत्पादक व थकीत घटकांना मिळते का, याकडे आता तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
ऊस वाहतूक करारासाठी सह्या केलेले धनादेश आम्ही कारखाना व्यवस्थापनाला दिले होते. त्या धनादेशांचा गैरवापर करून माझ्या नावावर जवळपास २५ लाख रु. कर्ज काढले आहे. याबाबत मुंबई येथे गत पाच-सात वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रिया आमच्यावर सुरू आहे. यात आमचा दोष काय? शासनाने व प्रशासनाने यात लक्ष घालून तालुक्यातील ऊस उत्पादकांना व आम्हा ट्रकमालकांना न्याय द्यावा.
विलासराव वाघ, अध्यक्ष, रासाका ट्रकचालक-मालक संघटना
तालुक्यातील साखर कारखाना सुरू राहावा, या भावनेतून बाहेरील कारखाने जादा भाव देत असतानाही के.जी.एस. साखर कारखान्याला १७० टन ऊस पाच वर्षांपूर्वी दिला होता. रात्रंदिवस उसाला पाणी भरून जगवलेल्या उसाचे साडेतीन लाख रुपये कारखान्याकडे बाकी आहेत. पोलिसांत फिर्याद देऊनही अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही.
रणजित रामनाथ गीते, ऊस उत्पादक, शिंगवे