पंचवटी | प्रतिनिधी
हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टनुसार नाशिक शहरासह तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात गेल्या चोवीस तासात झालेल्या सततच्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदा घाटावरील गांधी तलाव, रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले आहे. शहर व उपनगरातील पावसाचे पाणी गोदावरीत येत असल्याने नदीला पूरजन्य स्थिती येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
बुधवारी (दि.१८) रात्रीपासूनच परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम नाशिक शहरातील गोदावरीच्या मुख्य प्रवाहावर दिसून येत आहे. नदीच्या काठावरील रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलकही लावले आहेत.
महापालिका व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनी गरज नसताना नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीच्या पाण्याच्या वाढीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरवासीयांना सतर्कतेचा इशारा देत पावसाळ्यात सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





