नाशिक । अजित देसाई
मोडलेल्या माणसांची दुःख ओली झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना…. कोणती ना जात ज्यांची ना धर्म कोणता, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना….
या उक्तीनुसार राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी सांगितलेल्या मानवता धर्माचे आचरण करण्याचे काम नाशिकस्थित सु-संस्कृती फाऊंडेशनतर्फे सुरू आहे. ‘एक मुठ्ठी अनाज’.. या योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न आहे. एड्सग्रस्तांसाठी काम करणारी इनफंट इंडिया आणि ऊसतोडणी मजुरांसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचा सांभाळ करणार्या शांतीवन या बीडमधील दोन संस्थांना वर्षभर पुरेल इतके धान्य आणि आवश्यक किराणा साहित्य संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
समाजात आजही संवेदनशील लोकांची कमी नाही. केवळ त्यांच्यापर्यंत योग्य लोक पोहचत नाही; ही उणीव सु-संस्कृती निश्चितच भरून काढेल. आपल्या संपर्कात येणार्या लोकांना ‘एक मुठ्ठी अनाज’.. या उपक्रमाविषयी पटवून देताना संस्थेचे कार्यवाहक त्यांना प्रति महिना शंभर रुपये याप्रमाणे वर्षाकाठी १२०० रुपये देणगी देण्याचे आवाहन करतात.
जमा होणार्या रकमेतून इनफंट इंडिया आणि शांतीवनसाठी वर्षभराचे धान्य विकत घेऊन ते पोहचवले जाणार आहे. देणगी रोख स्वरूपात तसेच धनादेश आणि ऑनलाईन पेमेंट अॅपद्वारे देखील जमा करता येणार आहे. मुठ्ठीभर अनाज योजनेत सहभागी होणार्याने अधिकची रक्कम देणगी म्हणून दिली तरी चालते. शिवाय तुमच्या प्रियजनांच्या स्मरणार्थ देखील धान्य व किराणा विकत घेऊन देता येईल किंवा मोठे व्यापारी व्यावसायिक देखील आपल्या इच्छेनुसार धान्य-तेल आदी वस्तू देऊ शकतील.
अशोक आचार्य हे या योजनेचे प्रमुख असून धनंजय जैन सु-संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक आहेत. आशिष पांडे, प्रमोद देव, समीर भावे हे पदाधिकारी म्हणून जबाबदारी वाहत आहेत. इनफंट इंडिया या संस्थेशी नाशिकमधील विविधस्तरात कार्यरत असणार्या दोनशेहून अधिक व्यक्ती जोडल्या गेल्या असून भविष्यात त्यांच्याच माध्यमातून सु-संस्कृतीचे काम देखील पुढे नेण्यात येणार आहे.
इनफंट इंडिया, शांतीवनबद्दल …
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पाली येथे दत्ता बारगजे यांनी सुरु केलेल्या इनफंट इंडिया या एड्सग्रस्तांच्या शेल्टर होममध्ये ७० मुले -मुली आणि ८ विधवा आश्रयाला आहेत. या मुला-मुलींच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी संस्थेकडून घेण्यात आली आहे. तर शिरूर कासार तालुक्यात आर्वी येथे दीपक नागरगोजे यांच्या शांतीवनमध्ये ऊसतोडणी कामगार आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची २६८ मुले-मुली आहेत. या दोन्ही ठिकाणी चालणारी कामे सु-संस्कृतीच्या टीमने जवळून पहिली आहेत. त्यामुळे ‘मुठ्ठीभर अनाज’ योजनेचे सत्पात्री दान सार्थकी लागेल, असा विश्वास सर्वांना आहे.
२८ जानेवारीला शुभारंभ
ख्यातनाम संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या स्मरणार्थ २८ जानेवारीला प. सा. नाट्यमंदिरात संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. तेथेच ‘मुठ्ठीभर अनाज’ योजनेचा औपचारिक शुभारंभदेखील केला जाईल. नाशिकसोबतच राज्यात या योजनेची व्याप्ती वाढवून सर्वसामान्य समाजघटकांना मोहिमेत सामावून घेतले जाईल, असे प्रकल्प प्रमुख आचार्य यांनी ‘देशदूत’ला सांगितले.
नाशिप्रच्या शाळांची प्रेरणा
दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात भयाण दुष्काळाची परिस्थिती होती. त्यावेळी इनफंट इंडियातून मदत स्वरूपात तूरडाळ पाठवण्याची विनंती आचार्य यांच्याकडे करण्यात आली. एड्सग्रस्तांच्या आहारात तूरडाळ अधिक प्रमाणात देण्यात येत असल्याने किमान १५ पोती तुरडाळीची आवश्यकता होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी लोकांकडे हात पसरले तरी किती मदत मिळणार असा विचार करून आचार्य यांनी नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिवांकडे शहरातील चार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूठभर तूरडाळ देण्याचे आवाहन करण्याची परवानगी मागण्यात आली. आणि केवळ दोनच दिवसांत चार शाळांमधून विद्यार्थीं-शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे १२ पोती डाळ जमा झाली.