नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील नगरपरिषदांसाठी मंगळवारी (दि. २) होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १) सकाळी अकरा वाजेपासून सशस्त्र पोलीसांसह फोर्सने विविध नगरपरिषदांच्या क्षेत्रातील गल्लीबोळांसह संवेदनशील ठिकाणांचा ताबा घेतला. सर्व नगरपरिषदांच्या क्षेत्रात स्थानिक पोलीस, दंगल नियंत्रण पथकांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना तैनात करण्यात आल्या असून ग्रामीण व शहर पोलिसांनी चोख नियोजन केले आहे.
नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी तापली असून मतदानापूर्वी पोलिसांनी चौकांचौकांसह जिल्ह्यातील व शहरातील गस्त वाढवली आहे. सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांच्या मतदानासाठी नेमलेल्या पोलीस बंदोबस्तासह सुरक्षेचा आढावा घेतला. तर शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही भगूर नगरपरिषदेच्या बंदोबस्ताबाबत आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) आणि दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व होमगार्डची अतिरिक्त कुमक नेमण्यात आली आहे. संवेदनशील लढतींच्या ठिकाणी उमेदवारांनाही संरक्षण देण्याची तजवीज पोलिसांनी ठेवली आहे.
दरम्यान, भगूरसाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातून १२५ अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, देवळाली कॅम्प, उपनगर, नाशिकरोडसह आयुक्तालयातील मनुष्यबळ पुरविण्यात आले असून एक दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) तैनात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




