येवला | Yeola
अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे निधनाने माझ्या आयुष्यात ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. आजही त्याचं निधन मन स्वीकारला तयार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता, शिस्तप्रिय आणि जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माऊली लॉन्स येवला येथे शोकसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खरतर हा असा प्रसंग आपल्यावर येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. २७ जानेवारी रोजी कॅबिनेट मिटिंगच्या (Cabinet Meeting) निमित्ताने दिवसभर सोबत होतो. २८ तारखेला अचानक त्याचं विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या या बातमीने मन सुन्न झाले होते. कुठलाही शब्द सुचत नाही. या घटनेने सोन्यासारखी माणसं आपल्यातून आज निघून गेली आहे. ही अतिशय धक्का लाऊन जाणारी घटना माझ्या आयुष्यात घडली असून अद्यापही माझं मन हे स्वीकारायला तयार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हे देखील वाचा : Nashik News : अजित पवारांचा अस्थिकलश आज जिल्ह्यात; नाशकात सर्व पक्षीय शोकसभा
ते पुढे म्हणाले की, गेली अनेक वर्ष अजितदादा यांच्यासोबत काम करत आलो. माझ्या ज्येष्ठत्वाचा त्यांनी नेहमीच आदर केला. कुठल्याही विषयावर त्यांना माहिती दिली की त्यावर त्यांनी लगेचच काम केले. अतिशय शिस्तप्रिय जिंदादिल स्पष्टवक्ता नेते होते. अजितदादांची ओळख एक ‘कडक शिस्तीचे प्रशासक’ अशी होती. त्यांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू व्हायचा आणि मंत्रालयात ते सर्वांत आधी पोहोचायचे. सत्तेत असो वा नसो, जनतेचे प्रश्न ऐकणे, त्यावर ठाम भूमिका घेणे आणि अंमलबजावणीसाठी झटणे, हा त्यांचा स्वभाव होता, असे भुजबळांनी म्हटले.
तसेच शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, उद्योग, सहकार सर्व घटकांना त्यांनी आपल्या कार्यकाळात न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ‘कडक शिस्तीचे प्रशासक’ अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळताना त्यांनी आर्थिक नियोजनात कमालीची शिस्त पाळली. फाईलींचा निपटारा करण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नसे. “जे बोलायचे ते करून दाखवायचे” या वृत्तीमुळे अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक होता आणि सर्वसामान्यांचा त्यांच्यावर विश्वास होता, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, अजितदादांनी नाशिक जिल्ह्यावर (Nashik District) ‘अर्थकृपा’ करत विकासकामांचा डोंगर उभा केला. ९ ऑगस्ट २०२४ रोजी येवल्यातील विणकर मेळाव्यात त्यांनी २५ हजार कोटींच्या वस्त्रोद्योग धोरणाची घोषणा करून विणकरांच्या जीवनात प्रकाशाची किरणे आणली. अजितदादा हे केवळ शहरी विकासाचे नेते नव्हते, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. किकवी धरण, ओतूर, पुनंद आणि मांजरपाडा या प्रकल्पांसाठी त्यांनी दिलेले अर्थबळ ऐतिहासिक आहे. सिन्नरच्या पूरचाऱ्यांसाठी दिलेला १०० कोटींचा निधी त्या भागातील दुष्काळ हटवण्यासाठी मैलाचा दगड ठरला, असेही छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रद्द होण्याच्या उंबरठ्यावर असताना, नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी ६७२ कोटींचा निधी मंजूर करून बँकेला आणि ५६ हजार शेतकऱ्यांच्या जमिनींना वाचवले. बँक बुडवणाऱ्या संचालकांवर कारवाई व्हावी, पण शेतकऱ्यांचा बळी जाऊ नये, ही त्यांची भूमिका शेतकरी हिताची होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे मार्गासाठी त्यांनी ५०० कोटींची तरतूद करून भूसंपादनाला वेग दिला. त्यांच्या निधनाने आज महाराष्ट्र पोरका झाला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. अजितदादा यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना. व्यक्त करतो दादा,हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.




