नाशिक | Nashik
राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी रोजी बारामती (Baramati) येथे विमान अपघातात निधन झाले होते. त्यामुळे राज्यभर शोककळा पसरली होती. मात्र, त्यांचा अपघात नसून हा घातपात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. अजित दादा हयात असताना अनेकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात बैठका झाल्या होत्या, असा दावा केला होता.
तसेच अजित पवार यांना संघटनेत अनेक बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता, त्यामुळे ते अनेक बैठकांमध्ये होते, असंही रोहित पवारांनी म्हटले होते. त्यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलतांना भाष्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, “अजितदादांनी रोहित पवारांसोबत काय ठरवलं होतं ते त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. त्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही. अजित दादांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतल्याने त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. आता आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार असल्याने त्यांच्याशी बोलावे.
विलीनीकरण झालं नव्हतं त्याआधी कोणत्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. त्यामुळे कोणी काहीही सांगितलं तर आम्ही त्याच्यावर काय बोलणार”, असे भुजबळ यांनी म्हटले.
आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार होते. मात्र, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर इंजिनिअरला बोलून विमानातील बिघाड दूर केला. त्यानंतर भुजबळ धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी दाखल झाले.





