मुंबई | Mumbai
आगामी सिंहस्थासाठी तपोवनातील (Tapovan) तब्बल १८०० झाडं तोडली जाणार जाणार आहे. मात्र या झाडांच्या तोडीला नाशिकमधील नागरिकांनी तीव्र आंदोलन करत विरोध दर्शविला आहे. कालच ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोजक्या जागांपैकी तपोवन ही एक आहे. तपोवनमध्ये जवळपास ६० वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत, त्यातील अनेक औषधी वनस्पती आहेत. अनेक वर्षांपासून तिथे निसर्गाचे चक्र सुरू आहे. या तपोवनाने आपल्यापेक्षाही जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, असे म्हणत त्यांनी तपोवनातील झाडे तोडण्यास विरोध केला होता. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? असा सवाल करत तपोवनातील झाड तोडीला विरोध केला आहे.
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एक्स (ट्विट) या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले की, आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं (Tree) तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? असे राज म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम (Sadhugram) करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो.आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच जमिनी (Land) गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच!असेही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.




