नाशिक | प्रतिनिधी | Nashik
यंदा एक महिन्याआधीच वरुणराजाचे आगमन झाल्याने जिल्हा हिरवाईने नटला आहे. आता पावसाळा (Monsoon) नियमित सुरु झाल्याने जिल्ह्यातील वनक्षेत्रात नयनरम्य पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावत असून पूर्वी विविध स्थळांवर झालेल्या घटनांमध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणूण यंदा पावसाळी पर्यटनावर वनविभागासह (Forest Departemnt) पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी आतापासून वनविभागाने पूर्वतयारी पूर्ण केली आहे.
दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या विकेंडमुळे पुन्हा गर्दीची शक्यता असल्याने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भंडारदरा या वनक्षेत्रात बॅरकेडिंग करून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यातील (District) पर्यटन स्थळांवर दरवर्षी हौशी पर्यटकांची गर्दी होते.,त्यातून अनेकदा पाण्यात बुडून, उंचावरून पडून किंवा अपघातात काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातही पावसामुळे पर्यटनस्थळे (Tourist Point) हिरवीगार होत असून धबधबे, नदी ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
त्यामुळे पुढील काही दिवसांत पर्यटकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बन विभागाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ब्रह्मगिरी, अंजनेरी, हरिहर गड, दुगारवाड़ी धबधबा, नेकलेस फॉल (पहिणे) सह इतर पर्यटन क्षेत्रांत मद्यपान करणा-यांना प्रवेश नाकारला जाणार आहे. विशेष म्हणजे कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.
पश्चिम वनवृत्ताचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावडेकर, सहायक बनसंरक्षक (प्रादेशिक) प्रशांत खैरनार यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्यासह पथकाने (Squad) उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यानुसार, वनरक्षक व पेट्रोलिंग पथके विविध पर्यटनस्थळांवर तैनात करण्यात आली आहेत. हुल्लडबाजांना दंडक्याचा प्रसादही मिळणार आहे.
ही आहेत निसर्गसंपन्न स्थळे
ब्रह्मगिरी, अंजनेरी, हरिहर, साल्हेर-मुल्हेर, रामशेज, चामरलेणीसह पहिने नेकलेस फॉल, द्वारवाडी धबधबा, कुरुंगवाडी, वाघेरा, भास्करगड, भावली, अप्पर वैतरणा, त्रिंगलवाडी, कळसूबाई शिखर, गंगापूर डॅम, दारणा धरण, सप्तशृंग गड.
पथके कार्यरत
पर्यटन स्थळांवर वनखात्यासह पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. हुल्लडबाज व अतिउत्साही पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष लक्ष असून स्थानिकनागरिक, संस्थांच्या मदतीने पर्यटकांना सूचना दिल्या जातील. विविध मागौवर वाहन तपासणी केली जाईल. मद्यपी व टवाळखोरांवर प्रसंगी गुन्हे नोंदवू.
- महेश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर
पर्यटकांसाठी सूचना
- पर्यटकांनी सुरक्षारक्षक, गाईडने सूचनांचे पालन करावे
- कुणाशीही हुजत न घालता गैरवर्तन करु नये,
- धोकादायक ठिकाणी सेल्फी, रिल्स बनवू नये.
- पर्यटकांनी गड, किल्ले, धबधब्यांची भौगोलिक माहिती ठेवावी.
- हरिहर गडावर रोज तीनशेच पर्यटकांना प्रथम प्राधान्याने प्रवेश.
- कुमारी दोन वाजेनंतर गडावर प्रवेश नाही.
- गडावर मोठा ग्रुप येत असल्यास ७२ तासांआधी तशी नोंदणी करावी.
- दुगारवाडी धबधबा व नेकलेस फॉल येथे सकाळी आठपासून प्रवेश.
- सायंकाळी साडेचारनंतर पर्यटकांनी येथून बाहेर पडावे





