नाशिक | Nashik
गोदावरी नदीच्या (Godavari River) पूरजन्य परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रवाह संथ गतीने व स्वच्छ पद्धतीने पुढे जावा, यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत यांत्रिकी गेट उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला गोदाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला. नदीपात्रात कोणतेही बांधकाम करण्यास बंदी असताना, स्मार्टसिटी प्रशासनाने हा प्रकल्प पुढे रेटल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्मार्ट सिटीच्या (Smart City) या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पर्यावरणाचा विचार करून या प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. यांत्रिकी गेटची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेत केलेली कामे यावरच नाशिककरांचा (Nashik) विश्वास आणि गोदावरीच्या भविष्यातील स्थिती अवलंबून राहणार आहे. सध्या जून महिना सुरू असून, यंदाचा पावसाळा वेळेत सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अशा परिस्थितीत यांत्रिकी गेटचे ट्रायल काम पूर काळात होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेटचे काम पूर्ण न झाल्याने, त्याचा प्रत्यक्ष प्रयोग म्हणजेच ट्रायल आता पावसाळ्यात होईल काय? त्यामुळे पाण्याचा जोर वाढल्यास गेट आणि त्यासंदर्भातील संरचना वाहून जाण्याचा धोका नागरिकांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वी गेट पूर्ण करून त्याची चाचणी घेणे अधिक सुरक्षित ठरले असते, असेही गोदाप्रेमींचे म्हणणे आहे.
जुन्या वाड्यांना धोका?
नदीकिनारी असलेल्या अनेक जुने वाडे आणि वसाहतींना या नव्या यंत्रणेमुळे संभाव्य धोका आहे, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रवाह जोरात आल्यास या नव्या गेटद्वारे प्रवाह रोखला गेला नाही, तर तो थेट या जुन्या इमारतींवर आदळून गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे बंधारा जसा आहे तसाच ठेवावा आणि नव्या गेटचा प्रयोग टाळावा, अशी मागणी गोदाप्रेमींसह परिसरातील व्यावसायिक व नागरिकांतून पुढे येत आहे.
यांत्रिकी गेट म्हणजे काय?
स्मार्ट सिटीच्या माहितीनुसार, हवेच्या फुग्यांच्या माध्यमातून गेटची उघडझाप केली जाणार आहे. अमेरिकन तंत्रज्ञान यात वापरण्यात आलेले आहे. या यांत्रिकी गेटमुळे पाण्याचा प्रवाह जमिनीपासून सलग वाहता ठेवता येणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यात गाळ साचण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. सध्या होळकर पुलाखाली बंधारा आहे आणि पाण्याचा प्रवाह गतिमान झाल्यास त्या ठिकाणी बंधाऱ्यावरुन पाणी आदळण्यामुळे गोदावरी अधिक रौद्र रूप धारण करते. त्यावर उपाय म्हणून बलून तंत्रज्ञानावर आधारित हे गेट उभारले जात आहेत. गरज भासल्यास या गेटला भुईसपाट करण्याचीही सुविधा असल्यामुळे पाणी संथ गतीने वाहू शकते, असा दावा स्मार्ट सिटीकडून करण्यात येत आहे.
न्यायालयीन प्रक्रियेचा फटका की दुर्लक्ष?
या प्रकल्पाला गोदा प्रेमींकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. नदीपात्रातील अतिक्रमण व पर्यावरणाच्या दृष्टीने हे गेट योग्य नसल्याचा युक्तिवाद होता. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र या कामाला स्थगिती दिलेली नसल्याने स्मार्ट सिटीने काम सुरुच ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा नसताना देखील यांत्रिकी गेटची उभारणी प्रलंबित आहे. ३१ मीटरपर्यंत गेटचे काम पूर्ण करण्याचे ठरले होते आणि स्मार्ट सिटी योजनेची मुदत त्याच काळात संपुष्टात आल्याने हे काम वेळेवर पूर्ण झालेले नाही. यावर ठेकेदारांकडून विलंब कां झाला?, याची चौकशी कोणीच करत नसल्याचे दिसून येते.