नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मखमलाबाद (Makhmalabad) येथील तवली फाटा परिसरातील अमृतवन गार्डन जवळ शेताच्या विहिरीत पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू (Death) झाल्याची घटना १० मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी चिमुकलीच्या आईने म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) दिलेल्या फिर्यादीनुसार, चिमुकलीच्या पित्यासह आजी व शेतमालकाने निष्काळजीपणा दाखवल्याने तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी विकास वळवी असे विहिरीत बुडून मृत्यू (Death) झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. वैष्णवीची आई विद्या वळवी (रा. पोखरी नांदगाव, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्या पतीपासून विभक्त राहतात. त्यांनी वैष्णवीची चौकशी केली असता विकास वळवी यांनी सांगितले की, वैष्णवीचा पाण्यात बुडून (Drowning in Water) मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही बाब विद्या वळवी यांनी पोलिसांना सांगितली.
त्यानंतर न्यायालयाचा (Court) आदेश घेत तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिसांच्या समक्ष वैष्णवीचा पुरलेला मृतदेह (Dead Body) काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्यात पाण्यात बुडाल्याने वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातून समोर आला. त्यामुळे विद्या वळवी यांनी त्यांचे पती विकास हेमंत वळवी, सासू जिजाबाई हेमंत वळवी व शेतमालक विजय पिंगळे (तिघे रा. शिंदे मळा, मखमलाबाद) यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, विहिरीस (Well) कडा किंवा संरक्षक भिंत नसल्यामुळे व पती आणि सासूने वैष्णवीकडे दुर्लक्ष केल्याने ती विहिरीत पडली. त्यानंतर पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिघांनी केलेल्या दुर्लक्ष, निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हसरूळ पोलीस तपास करत आहेत.