नाशिक | Nashik
केंद्र सरकारने (Central Government) कांद्यावरील (Onion) लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे, शेतकऱ्यांना २५ रुपये किलो अनुदान मिळावे, नाफेड आणि एनएफसीसीने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी कांदा खरेदी भ्रष्ट्राचार झाल्याने त्याची चौकशी करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मनमाड-येवला मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तसेच येवला-लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon APMC) संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव देखील बंद पाडले.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. मागील १० दिवसांत क्विंटल मागे जवळपास २ हजार रुपयांनी भाव घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला क्विंटलमागे सरासरी १८०० ते २००० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांद्याचे भाव गडगडल्याने, आहे त्या भावात उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर आज सुद्धा येवला-लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Yeola-Lasalgaon) कांद्याचे लिलाव बंद पाडले. दररोज होणाऱ्या कांद्याच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.