पंचवटी | प्रतिनिधी |Panchvati
श्रावण महिन्यातील शनिवार आणि सोमवारी कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Temple) दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी (Crowd) होत असल्याने मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात येते. यंदाच्या पहिल्या श्रावणी शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, मंदिराच्या पायऱ्यांलगत काही तृतीयपंथी जमा झाल्याने भाविकांना दर्शनासाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला.
गर्दीच्या ठिकाणी अडथळा निर्माण होत असल्याने काही भाविकांनी तृतीयपंथींना बाजूला होण्याची विनंती केली. त्यावरून वाद निर्माण होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ‘आम्ही कुठे थांबायचे?’ असा सवाल करीत त्यांनी गोंधळ घातल्याने परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. या प्रकारची माहिती मिळताच काही भाविकांनी पोलिसांना (Police) कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांशी चर्चा करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात शांत झाली. दरम्यान, श्रावणी सोमवारी (Shravan Monday) कपालेश्वर मंदिरात भाविकांची आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिराच्या पायऱ्या व दर्शनाच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस तसेच मंदिर प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.




