नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या (NMC) एकूण १२२ जागांसाठी भाजपकडे (BJP) ५२५ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. एकेका जागेसाठी पाच-पाच जण इच्छुक असल्याने उमेदवारी (Candidacy) मिळविण्यासाठी चांगलाच कस लागणार आहे.
सध्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील (Mahayuti) घटकपक्ष एकमेकांसमोर आहेत. मनमाड आणि नांदगाव येथे शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीतीलच राष्ट्रवादी अजित पवार गटात लढत आहे. भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाविरुद राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहेत. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीत राजकारण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
आगामी निवडणुकीतही महापालिकेवर कमळच फुलले पाहिजे, यासाठी भाजपने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शिवसेना काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना गळास लावण्यात भाजपला यश आले आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर भाजपने जबाबदारी सोपविलेली असल्याने त्या दृष्टीने ते तयारी करण्यात गुंतले आहेत. महापालिका निवडणूक महायुती म्हणून घटकपक्ष लढवतील की स्वतंत्रपणे, ते अद्याप निश्चित नाही. वरिष्ठ नेते महायुती म्हणून लढण्यावर भर देत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ऐनवेळी महायुती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आल्यास तयारीत असावे, म्हणून भाजपने प्रत्येक जागेसाठी चाचपणी केली आहे.आ. राहुल ढिकले, भाजर शहरप्रमुख सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपसाठी योग्य उमेदवार (Candidate) कोणता राहील, याची पक्षाकडूनही चाचपणी करण्यात येत आहे. उमेदवार निवडीसाठी पक्षाने चतुःसूत्री निश्चित कली आहे. त्यात उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता, त्या प्रभागातील सामाजिक समीकरण, नागरिकांमध्ये असलेली प्रतिमा आणि पोलीस पडताळणी यांचा समावेश आहे. याशिवाय पक्षाच्या सर्व्हेत मिळणारी माहिती महत्वाची ठरणार आहे.
गेल्या काही दिवसात पक्षातील आयारामांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतानवर अन्याय होऊ नये, याची दक्षताही उमेदवार निश्चित करताना भाजपला घ्यावी लागणार आहे. नाशिकमधील (Nashik) वाढत्या राजकीय गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून देण्यात येणारा उमेदवार निष्कलंक असावा, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, याकडेही पक्ष जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. त्यामुळेच संभाव्य उमेदवारांची पोलिसांच्या लेखी असलेली पार्श्वभूमी तपासली जात आहे, अशी माहिती केदार यांनी दिली. महापालिकेसाठी महायुती झाल्यावर पक्षाच्या वाट्याला किती जागा येतील, त्यानुसार उमेदवार निश्चित केले जातील. परंतु स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आली तरी भाजप सक्षम असल्याचेही केदारांनी नमूद केले आहे.





