लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon
केंद्र सरकारच्या (Central Government) भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफमार्फत (Nafed and NCCF) खरेदी केलेला कांदा आता थेट बाजारात विकला जाणार आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा कांदा फक्त २४ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, लासलगाव (Lasalgaon) येथून ८४० मेट्रिक टन (२१ डब्यांचा) कांदा रेल्वेने कोलकात्याकडे (Kolkata) पाठवण्यात आला. कोलकात्याच्या बाजारात हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहे. लासलगाव बाजार समितीत आज कांद्याचे दर अचानक २०० रुपयांनी घसरले असून, सरासरी दर १००० ते १२०० रुपये प्रति क्विंटलवर आले.
येवला बाजार समितीतही (Yeola Market Committee) दर ८५१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी, केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांना फोन करून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यास सुरुवात केली आहे. जर यावर तातडीने तोडगा काढला नाही तर पुढील टप्प्यात मुंबई आणि दिल्लीतील मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आणि चिंता
शेतकऱ्यांच्या (Farmer) मते, सध्या १० ते १५ रुपये प्रति किलोने कांदा विकत असल्याने त्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यातच सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात आणल्यामुळे स्थानिक दरांमध्ये आणखी घट झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. ग्राहकांना जरी दिलासा मिळत असला तरी, शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. यामुळे येत्या काळात शेतकरी आणि सरकार यांच्यात संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.




