नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील बागलाण, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि भगूर या ११ नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचाराची (Election Campaigning) रणधुमाळी सोमवारी (दि.१) रात्री १० वाजता संपणार आहे. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मैदानात उतरून महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी प्रचार सभांमधून ताकद पणाला लावणार आहेत.
सिन्नर येथे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी ‘भाजप हा बाटलेला पक्ष आहे,’ असा घणाघाती आरोप केला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सिन्नर येथील प्रचारसभेत काय प्रत्युत्तर देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस सिन्नर आणि पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १२.३० वाजता त्र्यंबकेश्वर येथे तर उपमुख्यमंत्री अजित पवार सायंकाळी ५ वाजता भगूर आणि त्यानंतर ओझर येथे सभा घेतील.
दरम्यान, मंगळवारी (दि. २ ) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. बुधवारी (दि.३) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवार जनतेच्या दारात हात जोडून मत मागणार असून, ‘कोणाच्या आश्वासनांना मतदार साथ देतात?’ हे मंगळवारी स्पष्ट होईल. बुधवारी निकालानंतर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवे सत्तासमीकरण कसे आकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीतच बंडखोरी, तीव्र चुरस
जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने अंतर्गत बंडखोरी उघड झाली आहे. भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात थेट लढत आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारही प्रभावीपणे लढत देत आहेत. एकूण १,००० हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत.त्यामुळे नगराध्यक्ष पदाबरोबरच नगरसेवक पदासाठीही मोठी चुरस पहायला मिळत आहे.





