नाशिक | Nashik
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात राजेंद्र ढेरंगे या कर्मचाऱ्याला एका मेडिकल दुकानदाराकडून ३५ हजाराची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मंत्री झिरवाळ यांनी काल (शुक्रवारी) माध्यमांशी बोलतांना “या प्रकरणाशी माझा संबंध आढळून आल्यास मी राजीनामा देईन” असे म्हटले होते. यानंतर मंत्री झिरवाळ यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे सकाळपासून माध्यमांमध्ये झिरवाळ नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या झळकत आहेत. मात्र, आता झिरवाळ नेमके कुठे आहेत? याची माहिती समोर आली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीशी ‘देशदूत’च्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते मतदारसंघातील जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांच्या फोनला नेटवर्क नसल्याने झिरवाळ यांचा फोन (Phone) लागत नाही, अशी माहिती त्यांच्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातच (Nashik District) असून, त्यांच्या मतदारसंघात आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये (Nashik) आज पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडणार होते. या उद्घाटनासाठी ते ११ वाजता येणार होते. मात्र,झिरवाळ या संमेलनाला अनुपस्थित राहिल्याने आयोजकांचा हिरमोड झाला. मंत्री नरहरी झिरवाळ हे रविवारी किंवा सोमवारी मुंबईत (Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची लाचखोर प्रकरणाबाबत भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
माध्यमांशी बोलतांना झिरवाळ काय म्हणाले होते?
मंत्रालयातील संबंधित लाचखोरी प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. याप्रकरणाची लिंक जर माझ्यापर्यंत आली तर मी निश्चितच मी राजीनामा देईन. लाच घेताना पकडला गेलेला ढेरंगे हा लिपीक म्हणून काम करतो. सुनावणीची कागदपत्रे बनविण्याचे काम त्याच्याकडे आहे. ढेरंगे मूळचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसनवारी तत्वावर घेतले आहे. त्याला पाठिशी घालण्यात येणार नाही. घडलेला प्रकार अतिशय चुकीचा आहे. माझ्या मंत्री कार्यालयातील खासगी सचिव किंवा ओएसडी यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझ्या विरोधात कोणी हा कट रचला आहे, असे मला वाटत नाही. कारण मी कधीच काही चुकीचे केले नाही वा करतही नाही, असे मंत्री झिरवाळ यांनी म्हटले होते.





