घारगाव | Ghargav
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील माळवाडी (बोटा) परिसरात झालेल्या पावसाने मोटारसायकल घसरून पाठीमागे बसलेला 28 वर्षीय तरुण रस्त्यावर पडला. मात्र, पाठीमागून येणार्या ट्रकचे टायर डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची घटना मंगळवारी (दि.26 ) सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली.
सुनील भिमा मधे (रा.-खैरदरा-कोठे बु. ता. संगमनेर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुचाकी चालक तेजस गणेश मधे (वय-32), प्रीती तेजस मधे (वय-2), सुनील भिमा मधे (वय-28) हे तिघेजण नाशिक पुणे महामार्गाने दुचाकीवरून (एम.एच.17, बी.एच.6631) घारगाव येथून आळेफाट्याच्या दिशेने चालले होते. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ते माळवाडी (बोटा) परिसरात आले असता झालेल्या पावसाने त्यांची दुचाकी घसरली. यातील पाठीमागे बसलेला सुनील मधे महामार्गावर पडल्याने पाठीमागून आलेल्या ट्रकचा (एम.एच.20,ई.जी.3726 )टायर त्याच्या डोक्यावरून गेला. यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. अपघातात तेजस मधे व प्रीती मधे सुदैवाने बचावले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनेष शिंदे, सुनिल साळवे, योगीराज सोनवने यांसह पोलीस पाटील संजय जटार, शिवाजी शेळके, गणेश शेळके,गणेश काळे,योगेश काळे आदींनी धाव घेत मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविला. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहेत.