नवी दिल्ली | New Delhi
देशात वस्तू आणि सेवा कर (GST) व्यवस्थेत मोठा बदल सोमवार (दि.२२ सप्टेंबर) पासून होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलने केलेल्या सुधारणेनुसार आता कर रचना सोपी केली गेली आहे. या कररचनेमुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार असून, ग्राहकांना (Customer) थेट फायदा होणार आहे.
नव्या कररचनेमुळे कार, दुचाकी, जीवनावश्यक वस्तू, घरबांधणीसाठी लागणारे साहित्य यापैकी काहींच्या किंमतींमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. विशेषत: टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, पॅकेज्ड फूड्स, सायकली, स्टेशनरी आणि ठराविक किंमतीखालील कपडे-पादत्राणे आता कमी दरात मिळण्याची शक्यता आहे. तसेच घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि काही बांधकाम साहित्य यांच्यावरचा जीएसटी कमी झाल्याने तेही स्वस्त होणार आहेत.
याशिवाय वाहन उद्योगालाही याचा फायदा होणार असून, लहान कार आणि दोन चाकी वाहने खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे. सध्या ग्राहकांच्या दृष्टीने अन्नपदार्थांच्या दरात मोठी घट होणार आहे. यामध्ये पनीर, भाकरी, पराठा यांवरील कर शून्यावर आला आहे. तर तूप, लोणी, नूडल्स, पास्ता, टॉफी, कँडी आणि फ्लेवर नसलेले पॅक मिनरल वॉटर यांवरील करात ७ ते १३ टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि किराणा बाजारात दर कमी होण्याची शक्यता आहे.
महागड्या वस्तूंवरील कर दर वाढणार
तसेच तंबाखू, दारू आणि लग्जरी वस्तूंवरील कर दर मात्र वाढवण्यात आला आहे. त्यावरून सरकारने साध्या ग्राहकांना दिलासा दिला असला तरी श्रीमंत वर्गावर अतिरिक्त भार टाकला असल्याचे बोलले जात आहे.तर पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या बाहेरच राहणार असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल होणार नाही. तसेच हिरे, मौल्यवान दगड आणि इतर लक्झरी वस्तूंवरही उच्च करदर कायम राहणार आहेत.
असे आहे नवीन कर दर
चार वेगवेगळ्या कर स्लॅब्सऐवजी दोन मुख्य स्लॅब आणि एक “अतिरिक्त कर” (Sin Good Tax) स्लॅब लागू करण्यात आला आहे. यामध्ये ५ टक्के आवश्यक वस्तूंसाठी, १८ टक्के बहुतांश वस्तूंसाठी आणि ४० टक्के लग्जरी तसेच इतर वस्तूंसाठी कर आकारला जाणार आहे.




