नवी दिल्ली | New Delhi
जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kahsmir) पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. यांनतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी संपूर्ण जगाला भारताच्या लष्कराची (Indian Army) ताकद बघायला मिळाली. यांनतर भारतीय सैन्यांकडून ऑपरेशन सिंदूरबाबत लष्करी कारवाईचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले जात आहेत. अशातच आता पुन्हा एकदा भारतीय सैन्यांकडून ऑपरेशन सिंदूरचा आणखी एक नवा व्हिडीओ एक्स हँडलवरून (ट्विटर) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीने राबवलं आणि दहशतवादी तळांना कशा प्रकारे उद्ध्वस्त केले याची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Planned, trained & executed.
Justice served.@adgpi@prodefencechan1 pic.twitter.com/Hx42p0nnon
— Western Command – Indian Army (@westerncomd_IA) May 18, 2025
भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांड या एक्स (ट्विटर) हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ७ मे आणि त्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तानमधील (India vs Pakistan) तणावादरम्यान भारताने पाकिस्तानी हद्दीत लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला होता. त्या संदर्भातील माहिती या व्हिडीओतून दाखवण्यात आली आहे. यामध्ये एक जवान, “हे (ऑपरेशन सिंदूर) पहलगाम दहशतवादी हल्यानंतर सुरू झाले. मात्र, हा सूड नव्हता, तर न्याय होता. तसेच आता भविष्यात देखील लक्षात ठेवलं जाईल असा धडा शिकवण्याचा हा संकल्प होता”, असे म्हणतांना ऐकू येत आहे.
दरम्यान, शनिवार (दि. ११ मे) रोजी भारतीय डीजीएमओच्या (डीजीएमओ) तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत (Press Conference) त्यांनी “ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले, त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य झाले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य झाले का? असे आपण विचारल्यास याचे उत्तर हो असे आहे, तसेच त्याचे परिणाम जगासमोर आहेत”, असे म्हटले होते.