Tuesday, May 7, 2024
Homeब्लॉगनैसर्गिक समतोल : क्रांतीची गरज

नैसर्गिक समतोल : क्रांतीची गरज

पर्यावरणीय असमतोलाचा फटका आपल्या भावी पिढीला सोसावा लागणार आहे. ही पिढी या विषयाबाबत अज्ञानी, बेफिकीर आहे. यातल्या अनेकांना पर्यावरण, प्रदूषण किंवा हवामानातील बदल कळतही नाहीत; पण आजघडीला निसर्गाच्या बदलत्या रंग-ढंगांबाबत प्रत्येकाच्या मनात काही तरी हालचाल झालीच पाहिजे. संपूर्ण जगात नैसर्गिक समतोलाबाबत जागतिक क्रांतीची गरज आहे.

इजिप्तमध्ये अलिकडेच पार पडलेल्या जागतिक पर्यावरणविषयक बैठकीतून काही चांगले संकेत मिळायला हवे होते. तिच्यातून हरित ऊर्जेवर भर द्यायला हवा होता; जेणे ेकरून ढासळणारे हवामान संतुलन बिघडू नये; परंतु प्रत्यक्षात ते दिसून आले नाही. हवा, पाणी, जमीन, जंगल याबाबत सर्वत्र चिंता निर्माण झाली आहे. हवामानातील बदल आपल्याला पन्नास वर्षांपूर्वी जाणवू लागले असले तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने पृथ्वी धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. परिस्थिती जशी आहे तशीच राहिली, तर हवामानबदलावरील सर्व परिषदा आणि इतर उपक्रम हे निव्वळ उत्सव ठरू शकतात.

पर्यावरणामध्ये असंतुलन जाणवताच ती चूक टप्प्याटप्प्याने सुधारायला हवी होती; पण तसे झाले नाही, जनजागृतीच्या नावाखाली जगभर मोठमोठ्या संघटना उभ्या राहिल्या, निधी गोळा झाला, अजेंडा ठरवला गेला. पृथ्वीशी न्याय होईल असे वाटले; मात्र किती न्याय मिळाला, याचे संशोधन करण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात हवामान बदलाशी संबंधित सर्व घटना घडल्या, प्रत्येकाने त्या पाहिल्या, अनुभवल्या आणि चिंतेत बुडलेले दिसले; पण इजिप्तमध्ये सर्वजण एकत्र आले, तेव्हा हवामान बदलावर गंभीर चिंतेऐवजी नवीन पाइपलाइन टाकून आफ्रिकेतून जीवाश्म वायू आणण्यात अमेरिकेचे स्वारस्य होते. अक्षय ऊर्जेवर ठोस चर्चा झाली नाही.

- Advertisement -

हवामानबदलामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत इतके मतभेद निर्माण झाले की काही निष्कर्ष निघतील की नाही, असे वाटू लागले. संपूर्ण वादविवाद ‘अधोगती आणि नुकसान’ यावर केंद्रित होता. त्याची भरपाई कार्बन उत्सर्जनासाठी सर्वात जबाबदार देशांकडून करण्यात आली होती. सध्याच्या घडीला पृथ्वीच्या बिघडलेल्या स्थितीचा परिणाम कमी होताना दिसत नाही. भविष्यातील पिढीबद्दल फसव्या चिंता किंवा ढोंग ही पृथ्वीच्या अस्तित्वासाठी अत्यंत गंभीर चिन्हे आहेत. जीवाश्म इंधनावर अवलंबून असलेल्या औद्योगिकीकरणापासून दूर राहतील आणि श्रीमंत देशांच्या, विशेषत: युरोपीय देशांच्या मनमानी आणि वसाहतवादी हितसंबंधांचे बळी ठरणार नाहीत, असा आवाज आफ्रिकन बेटांमधून येत असेल, तर त्यात गैर काय? अमेरिकेला आफ्रिकेतून नवीन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करायची आहे. प्रत्यक्षात युरोपीय गट रशियन वायूला पर्याय शोधत आहे. तोही आफ्रिकेकडे स्वार्थी नजरेने पाहत आहे. तेलावरून अनेक प्रकारची युध्दे झाली आहेत. रशियापेक्षा अमेरिका आणि युरोपियन गटासाठी आफ्रिकन देश सोपे लक्ष्य असू शकतात. हवामानबदलामुळे तेथील पिकांवर प्रचंड दुष्परिणाम झाले आहेत. दुसरीकडे, आफ्रिकेतील 600 दशलक्ष लोकांच्या घरापर्यंत वीज पोहोचलेली नाही. अशा स्थितीत अंधारलेले आफ्रिकन देश युरोप उजळून टाकतील, हे ऐकायला विचित्र वाटतं.

भारतात वर्षानुवर्षे वाढणारी भीषण उष्णतेची लाट असो, 2022 मधील इंग्लंड आणि संपूर्ण युरोपमधील भीषण उष्णतेची लाट किंवा पाचशे वर्षांची नोंद असलेला दुष्काळ असो किंवा मग पाकिस्तानमधील विनाशकारी पूर; जगातील जलद वितळणार्‍या हिमनद्यांमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. जगातील अनेक प्रांत बुडण्याचा धोका आहे किंवा सर्वच देशांना हवामानबदलाचा सामना करावा लागत आहे, त्याबाबत आपण कधी इशारा देणार? आत्तापर्यंत अशी परिस्थिती आपण केवळ 1.2 अंश सेल्सिअस तापमानातच वाढताना पाहिली आहे. हीच वाढ 1.5 अंश सेल्सिअस किंवा त्याहून पुढे गेली तर परिस्थिती कशी असेल, या कल्पनेनेच थरकाप उडतो. नवीकरणीय ऊर्जेसाठी पुरेसा निधी देऊन नैसर्गिक साधनसंपत्तीवरील अवलंबित्व वाढवू नये, असा करार इजिप्त परिषदेमध्ये केला जाणार होता. तसे न केल्याने आणखी एक संधी हुकली. शेवटी, जगभरात संपुष्टात येणारी नैसर्गिक संसाधने किती काळ आपल्यासाठी संधी बनत राहतील? कदाचित हीच वेळ आहे, जेव्हा हवामान समतोलावर हवामानप्रेमी संस्थांच्या हस्तक्षेपाची गरज आहे. प्रत्येक सामान्य माणसाला दिवसेंदिवस ढासळणारे हवामान समजले तर तो ते जगाला समजावून सांगू शकतो. प्रश्न केवळ सरकारांच्या अजेंड्याचा, देशांच्या प्रगतीचा, पैसा कमावण्याचा शर्यत किंवा बाहुबली बनण्यासाठी काहीही करण्याचा नाही; तर येणार्‍या पिढीच्या चिंतेचा आहे.

2015 मध्ये वसुंधरा दिनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही आपली गंभीर चिंता व्यक्त करताना म्हटले होते की, याला सामोरे जाण्याची जबाबदारी नव्या पिढीवर कशी टाकता येईल? भावी पिढीच्या प्रचंड आणि कधीही भरून न येणार्‍या संकटाचा तो उल्लेेख होता. यात भावी पिढीचा दोष काय? एका बाजूने विकास होत आहे असं दिसत असलं तरी या विकास प्रक्रियेद्वारे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास येते. परंपरागत विकास संकल्पनेत देशाच्या राष्ट्रीय उत्पादनातल्या वृद्धीच्या सहाय्याने विकासाचे मापन केले जाते. विशिष्ट कालावधीत देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ झाली म्हणजे विकास झाला असं गृहीत धरलले जाते; परंतु आर्थिक कामगिरी आणि मानवी कल्याणाच्या निर्मितीला पर्यावरणसंबंधित क्रिया प्रभावित करतात हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. उदा. उत्पादन आणि उपभोगासाठी नैसर्गिक साधने उपलब्ध असणे गरजेचे आहे; मात्र पर्यावरणाद्वारे टाकावू पदार्थांचे शोषण किंवा विलय, मानव समाजाच्या जीवन निर्वहनासाठी आवश्यक पर्यावरणीय सेवा आणि सुविधांची उपलब्धी या सर्व बाबी परंपरागत विकास संकल्पनेत गृहीत धरल्या जात नाहीत. अलीकडे विकास प्रक्रियेत या घटकांचा काही अंशी समावेश होताना दिसून येतो.

अर्थव्यवस्थेतील उत्पादन आणि उपभोगाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ, दूषित पाणी आणि अन्य प्रदूषकांची विल्हेवाट नद्यांची पात्रे, समुद्र किंवा त्यालगतची मोकळी जागा अशा नैसर्गिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पर्यावरणीय गुणवत्तेचा वेगाने र्हास होत आहे. एका बाजूने विकास प्रक्रियेच्या माध्यमातून लोकांचे उत्पन्न वाढल्याने व्यक्ती आणि समाजाच्या लाभात भर पडत असली तरी दुसर्या बाजूने विकास प्रक्रियेमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी, यात समतोल साधणारे विकासाचे प्रतिमान विकसित करणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या र्हासाचा व्यक्तीचे आरोग्य, सरासरी आयुर्मान, जीवन गुणवत्ता यावर प्रत्यक्ष परिणाम होतो. विशेष म्हणजे उत्पादन क्रियेच्या प्रतिकूल परिणामामुळे पर्यावरणाचा र्हास होत असेल तर त्यामुळे भविष्यातील उत्पादकता आणि मिळणारे यश कमी होत जाते. याचा अर्थ नैसर्गिक साधनांच्या वापरातून होत असलेला वैयक्तिक आणि सामाजिक व्यय आणि पर्यावरणाचा र्‍हास या बाबी परंपरागत विकासाच्या मोजदादीबरोबर विचारात घेणे शाश्वत विकास संकल्पनेला अर्थपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या