मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवालीत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर येताच राज्यातील अनेक ठिकाणी मराठा संघटना आक्रमक होत असल्याचं दिसून येत आहे. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील काही ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?” असा सवालही विचारला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.
“आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय… पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात… कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार.. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात? एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?” असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.