Friday, July 5, 2024
Homeराजकीय"पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर.."; शरद पवारांचे CM शिंदेंना पत्र

“पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर..”; शरद पवारांचे CM शिंदेंना पत्र

मुंबई । Mumbai

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्र लिहिले आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, मी दिनांक १२-१३ जून, २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौड तालुक्यातील अवर्षग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत.

मात्र दौऱ्यावेळी शेतकरी ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या करिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील सुचवल्या, सदर समस्या आणि मागण्यांबाबत प्रकल्प निहाय व ग्रामनिहाय स्वतंत्र टिप्पणी सोबत जोडली आहे. कृपया टिप्पणीचे अवलोकन व्हावे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती कि, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारणमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे. बैठकीत संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रीत करावे. सदर बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणून करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी. तसेच कायस्वरूपी उपाययोजनेसंदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या