नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने आज (सोमवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांची (Farmer) मोठी गर्दी दिसून आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, रोहित पवार, राजेश टोपे, दीपिका चव्हाण यांची भाषणे झाली. त्यांनी सरकारला विविध विषयांवरून घेरले. यावेळी आमदार रोहित पवारांनी हे सरकार तीन लबाड लांडग्यांचे असल्याचे म्हणत जोरदार निशाणा साधला.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, “शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. या मागणीसाठी सध्याच्या सरकारला जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे. दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, शासनाला याचे सोयरे सुतक नाही. यांना फक्त भ्रष्टाचार करायचा आहे. हे लबाड लांडग्यांचे सरकार असून सत्तेत तीन लांडगे बसले आहेत”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करणारे हे शासन निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, महिलांची सुरक्षा, रोजगाराचे आश्वासन शासनाने पाळले नाही. या सरकारला घमंड आली असून, सत्तेचा माज चढला आहे असे टीकास्त्रही आमदार रोहित पवार यांनी सोडले.
… तर सरकार हलवणार – शिंदे
आजचा आक्रोश मोर्चा म्हणजे शेकऱ्यांसाठी ही लढाई आहे. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा अशी मागणी करत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, मे महिन्यापासून पाऊस पडत असून, या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. आजचा मोर्चा ही सुरवात आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली नाही तर सरकारला हलवावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.तसेच कांद्याने भल्याभल्यांचे सरकारे पडली आहेत असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
ओला दुष्काळ जाहीर करा – टोपे
माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, “राज्यभर कोसळत असलेल्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारने चेहरे बघून शेतमाल नुकसानीचे पंचनामे करू नये. हे शासन आश्वासन पाळणारे नसल्याची टीकाही त्यांनी केली.
बिबट्याचा बंदोबस्त व्हावा – खासदार भगरे
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा संचार वाढला असून, त्यांचा बंदोबस्त करावा.अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्याची वेळ आली असून शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केली.
पिक्चर अभि बाकी है – खासदार लंके
आजचा आक्रोश मोर्चा हा ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है, असा इशारा देत आतातरी झोपलेले शासन जागे होईल का असा सवाल अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा, हमी भाव द्यावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.




