मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Election) उमेदवार न दिल्यामुळे महायुतीमधील भाजपच्या ॲड राहुल नार्वेकर यांची आज एकमुखाने फेरनिवड झाली.या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच विरोधी पक्षाच्या आमदारांनीही (MLA) नार्वेकरांचे अभिनंदन केले. याप्रसंगी राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आज विशेष अधिवेशनात पहिल्यांदाच विधानभवनात भाषण केले. त्यांनी शाब्दिक कोट्या करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करत विरोधकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “तुम्ही पुन्हा येईल म्हणाले नाहीत, तरी आलात…”; देवेंद्र फडणवीसांकडून भाषणावेळी चिमटे
यावेळी बोलतांना रोहित पाटील (Rohit Patil) म्हणाले की, “आज या देशाचे वेगळेपण टीकून आहे त्याचे कारण असे आहे की अनेक शाह्या या देशाने पाहिल्या. पण लोकशाही या देशाच्या वाट्याला आली ज्यामुळे संबंध जगामध्ये आपले देश वेगळेपण टिकवून ठेवू शकले.त्याचे दुसरे कारण संसदीय पद्धत आपण कमावली, त्यामुळे लोकशाहीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत. आपल्याला विनंती करेन की सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला आहे तसा मी सर्वांत तरुण सदस्य म्हणून मान पटकावला आहे. मंत्रिमंडळाच्या या तरुण सदस्याकडे बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. माझ्याकडे लक्ष असावे याचे कारण मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही कराल”, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : अजितदादांचा जयंत पाटलांना टोला; म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम झालाय…”
पुढे रोहित पाटील मुख्यमंत्र्यांचे (CM) अभिनंदन करतांना म्हणाले “देवेंद्र फडणवीस यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो. संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा,’ आता संतांच्या वाणीतूनही आपले नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले गेलेले आहे. त्यामुळे पुढच्या काळात तुम्ही विरोधी पक्षांना गोड पद्धतीची वागणूक द्याल अशी विनंती करतो,’ असे पाटील यांनी म्हटले. यावेळी अमृता या शब्दाचा उल्लेख झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही खळखळून हसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचं नाव अमृता (Amruta) आहे. तोच धागा पकडत रोहित पाटील यांनी भाषणातून बॅटिंग केली. अमृताहुनी गोड मी मुद्दाम म्हटले, कारण पुराणातसुद्धा अमृताला वेगळं महत्त्व होतं आणि आजही आहे. त्यावर रोहित पाटील पुढे, “अमृताहूनी मुद्दाम म्हणालो. पुराणांमध्ये अमृताला वेगळं महत्त्व आहे. आजही आहे. फडणवीस मी विनंती करेन की विरोधी पक्षालाही सहकार्य कराल”, असे म्हणाले.