मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची एकमुखाने फेरनिवड झाली आहे. या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कौतुक केले. यावेळी फडणवीस यांनी राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही ते पुन्हा आले असे वक्तव्य केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “पाच वर्षांच्या या संक्रमण काळात मीडियाचे (Media) तुमच्याकडे लक्ष होते. नार्वेकर अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्त्व आहे. मुंबई कोकणात अनेक दिग्गजांनी जन्म घेतला. सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान फक्त ४ लोकांनाच मिळाला आहे. त्यात आपण गणले जाणार आहात. सभागृहाचे काम आणि नियम यांचा अध्यक्षांचा चांगला अभ्यास आहे”, असे कौतुक यावेळी त्यांनी नार्वेकरांचे केले.
हे देखील वाचा : Nashik Winter : नाशिककरांना हुडहुडी! निफाडचे ६.७, तर नाशिकचे तापमान ९.४ अंशांवर
पुढे फडणवीस म्हणाले की, “गेली अडीच वर्षे कन्फ्यूजन अधिक होते. कोण कोठे होते हेच कळत नव्हते. याच काळात तुम्ही न्यायाधीशांचे (Judge) काम केले. अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईल असे तुम्ही म्हणाला नव्हता. तरी तुम्ही परत आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना त्यापैकी एक वकील होता. आता तुमच्यामुळे ५०-५० टक्के झाले आहे. तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला आणि न्याय देण्याचे काम तुम्ही कराल, यात शंका नसल्याचेही फडणवीस म्हणाले. तसेच तुम्ही खुर्चीला न्याय देण्याचे काम कराल. नाना भाऊ (नाना पटोले यांना उद्देशून) तुम्ही वाट मोकळी केलीत म्हणून नार्वेकरांना संधी मिळाली”, असा खोचक टोलाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणादरम्यान लगावला.
तसेच “सभागृहाच्या दालनांचा चेहरा अध्यक्षांनी बदलला. कितीही गरम चर्चा झाली तरी त्यांच्या दालनातील कॉफीने वाद संपतात. ते डावीकडील आणि उजवीकडील आवाज ऐकतात. त्यांना डावीकडील आवाज सूक्ष्मपणे ऐकावा लागेल. आम्ही विरोधी पक्षाचा आवाज ऐकू. ज्या कुलाबा मतदारसंघात विधानसभा आहेत, त्याचे आमदारही (MLA) आपण आहात, आम्ही सर्व आपल्या मतदारसंघात असल्याने आमची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे”, अशी जाणीव देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांना करून दिली.