मुंबई | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपयाचे अनुदान मिळाल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी तीव्र संताप व्यक्त केला. मंत्र्यांचा शाही थाट आणि शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, अशी टीका पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.
यावर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात कांद्याचे दर गडगडल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मालेगाव तालुक्यातील चिंचवाड येथील शेतकऱ्याने ११२ क्विंटल ९० किलो लाल कांदा विकला.
यापोटी सरकारकडून ३९ हजार रुपयांचे अनुदान मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त २५२ रुपये टाकण्यात आले, अशी माहिती पाटील यांनी आज ट्विट करून दिली. एकीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पंचतारांकित हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट आणि दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघे २५२ रुपये अनुदान देऊन सरकारने क्रूर थट्टा केली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.