धुळे – Dhule – प्रतिनिधी :
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या संगतीचा परिणाम या शब्द प्रयोगाची राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रपरिषदेत चांगलीच चिरफाड केली.
आपल्या संगतीत मी तीन वर्ष होता. परंतू त्याचा मला स्पर्शही झाला नाही. माझ्या संगती पेक्षा फडणवीसांनी त्यांच्या संगतीचा गांर्भीयाने विचार करावा, असा सल्लाही श्री. गोटे यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात संगतीचा परिणाम, असा शब्द प्रयोग केल्यानंतर आज अनिल गोटेे यांनी पत्रपरिषद घेवून फडणवीसांवर घणाघाती टिका केली.
पत्रपरिषदेला प्रशांत भदाणे, विजय वाघ, हिंमतसिंग पाटील आदी उपस्थित होते. श्री. गोटे पुढे म्हणाले की, भाजपाचे लोक आमचा नेहमी पारदर्शी कारभार असल्याचे म्हणतात. मात्र त्यांनी त्याची व्याख्या तरी सांगावी.
देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात गृहविभागाची वाट लावली. आपल्या लहरीपणाप्रमाणे त्यांनी अधिकार्यांच्या बदल्या करणे, कायद्यात तरतुद नसतांना आदेश देणे, आदेशाचे पालन करण्यास भाग पाडणे, असे उद्योग त्यांनी केल्याचा आरोपही श्री. गोटे यांनी केला.
फडणवीसांनी विरोधाला वैरत्वाचे रूप दिले, हे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच घडले. जी गोष्ट घडलीच नाही, त्याचा माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यावर भादवी 376 चा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी साधा तपास देखील करायचा नाही, हे पोलिसांचे वागणे कसे समर्थनीय ठरते, ते फडणवीसांनी सांगावे, असे श्री. गोटे म्हणाले.